मुंबई – ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले. काल शनिवारी पुणे, मुंबई आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे पुण्यातील अनेक भागात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. मात्र काल जोरदार पाऊस झाल्यानंतर आज पुण्यात ढगाळ वातावरण झाले आहे.
यातच आता विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील पाच ते सात दिवस पुणे परिसरात पाऊस कायम असण्याची शक्यता आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
कोणत्या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. आज रविवारी देखील राज्यातील काही भागात पाऊस होईल. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. बीड, हिंगोली, परभणी, जालना जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू होईल. दुसऱ्या आठवड्यात पावसाचा जोर वाढेल; परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहील, असा अंदाजही भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केला आहे.