मुंबई – ऐन उन्हाळ्यात राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. याचा अधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. यातच आता मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर या ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, सांगली, सोलापूर, जालना, बीड लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, बुलढाणा या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मार्च महिन्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस महाराष्ट्रात झाल्याचे माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. याकाळात अवकाळी पावसाने तब्बल 1 लाख 73 हजार 893 हेक्टरवरच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने याचा अधिक फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे.
पाऊस पडण्यामागचे कारण काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून राजस्थान आणि इतर परिसरावर हे चक्राकार वारे सक्रीय आहेत. तर पूर्व विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक किनारपट्टीपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून खंडित वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.