पुणे – गणेशोत्सव आला की मंडप, विद्युत परवाने मिळविणे, त्यासाठी प्रशासन आणि पोलिसांसोबत वाद घालणे आणि ढोल-ताशा पथकांवरील मर्यादेबाबत चर्चा करणे यामध्ये कार्यकर्त्यांचा वेळ वाया जातो. गणेशोत्सव हा लोकोत्सव असून, हा पुणेकरांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्सव आहे. जगभरात गणेशोत्सवाची ख्याती पोहोचवण्याचे काम पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे आमचे नियम, आमची आचारसंहिता आम्ही ठरवू, तुम्ही बंधने घालू नका, असे आवाहन मानाच्या गणेशोत्सव मंडळांसह गणेशोत्सव मंडळांनी प्रशासन आणि पोलिसांना केले आहे.
जय गणेश व्यासपीठातर्फे मानाच्या प्रमुख मंडळांसह शहर आणि उपनगरांतील मंडळे आणि कार्यकर्त्यांसाठी बाबुराव सणस मैदानासमोरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सजावट विभागाच्या आवारात बैठक झाली. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अण्णा थोरात, संजय मते, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, नगरसेवक हेमंत रासने, निंबाळकर तालीम मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, सूर्यकांत पाठक, शिरीष मोहिते, सुनील कुंजीर, संजय बालगुडे, ऍड. प्रताप परदेशीसह आदी उपस्थित होते.
मानाचे गणपती हा व्यवस्थेचा एक भाग आहे. गणपती हेच मानाचे दैवत आहे आणि सर्वच मंडळे ही मानाची आहेत. त्यामुळे आपण एकत्रितपणे आचारसंहिता ठरवून प्रशासन व पोलिसांना आपल्या बैठकीला बोलावू. स्पिकर लावून मिरवणुकीत धांगडधिंगा घालणे चुकीचे आहे. आपली एकजूट प्रशासनाला माहित असून खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम आपण केले आहे. त्याप्रमाणे मुळा-मुठा नदीसुधार करीत देखील सक्रिय होऊ, असे शेटे म्हणाले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.