मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमावरुन सध्या देशभर वेगवेगळी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. तसेच त्यावरून राजकारणदेखील होताना पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काश्मीर फाईल्सचे कौतुक केले आहे. तर भाजपशासित राज्यांमध्ये चित्रपट टॅक्सफ्री करण्याची मागणी होत आहे. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने अशी काही भूमिका घेतली नाही. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
द काश्मीर फाईल्समध्ये दाखवलेलं भयाण चित्र वस्तुस्थिती नाही का? हे एकदा मान्य करा. काश्मीर “मधला हिंदू माणूस पळून गेला नाही का?, काश्मीर मधल्या महिलांवर बलात्कार झाले नाहीत का?, तिथल्या पंडितांच्या प्रॉपर्टी हडप नाही केल्या का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील उपस्थित केलं.
दरम्यान तुम्ही काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करणार नसाल तर आम्ही आमची घरदारं विकून लोकांना सिनेमा दाखवू असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चित्रपटावरून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. महाराष्ट्र सरकारने युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असे देखील राऊत म्हणाले.