नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी बुधवारी टोयोटो कंपनीच्या मिराई या कारच्या सादरीकरणात भाग घेतला. ही कार हरित हायड्रोजनवर आधारित फ्युल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) या सदरातील आहे. पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीकोणातून ऊपयोगी असणारा प्रवासी वाहन क्षेत्रातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
अशा प्रकारची वाहन निर्मिती आणि वापर वाढण्यासाठी हा चांगला प्रयोग आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. गडकरी म्हणाले की, हायड्रोजन आधारित एफसीईव्ही शून्य उत्सर्जन करणारे वाहन असून त्यामुळे पर्यावरण संतुलनासाठी कमालीची मदत मिळणार आहे. यासाठी लागणारा हायड्रोजन हा अक्षय ऊर्जा स्त्रोतातून उपलब्ध केला जाऊ शकतो आणि यासाठीचा कच्चा माल भारतामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
भविष्यामध्ये भारताला वेगात विकास करायचा असेल तर अक्षय ऊर्जेचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी हायड्रोजन हे इंधन योग्य पर्याय ठरू शकते. या क्षेत्रात सरकार बरोबरच विविध कंपन्यांनी संशोधन आणि विकास करण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून भारतातील कंपन्या काम करीत असल्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी आणि इंटरनॅशनल सेंटर फोर ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजी या दोन संस्थांनी मिळून हा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर भारतामध्ये अशा प्रकारच्या कार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या या कारने 1,300 किमीचे अंतर कापले आहे. मिराई म्हणजे जपानी भाषेत भविष्य. म्हणून या गाडीचे नाव टोयोटा मिराई असे ठेवण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कार पूर्णपणे सुरक्षित आहे. कारमध्ये सेन्सर बसवलेले आहेत जे कोणतीही अडचण आल्यास संपूर्ण यंत्रणा बंद करतात.
टोयोटा मिराईमध्ये तीन हायड्रोजन सिलिंडर बसवण्यात आले आहेत. कारच्या आत सिलिंडर अशा प्रकारे ठेवले आहेत की सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. बुलेट प्रूफ सिलिंडर असून त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नाही. कारमध्ये ऑनबोर्ड वीज तयार होते आणि कार धावते. कारच्या मागील बाजूस 1.4 किलोवॅटची बॅटरी आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक वाहनापेक्षा 30 पट कमी आहे. एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करते. एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरला जातो.