बहारीच – उत्तर प्रदेशच्या निवडणूकीमध्ये जर आपल्या पक्षाने विजय मिळवला आणि सरकार स्थापन केले तर उत्तर प्रदेशातून जे लोक बाहेर गेले आहेत, त्यांना परत बोलावण्यात येईल आणि त्यांना आपल्या राज्यातच रोजगार मिळवून दिला जाईल, असे बसपा नेत्या मायावती यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात रोजगार निर्मिती न करणे आणि राज्यातून लोकांना स्थलांतरीत व्हायला भाग पाडण्याबद्दल मायावतींनी भाजप, समाजवादी पार्टी आणि कॉंग्रेसला जबाबदार धरले. प्रयागपूर भागातील प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या.
भाजप, सपा आणि कॉंग्रेसने कधीही आपल्या राज्यातील महान नेत्यांचा आदर केला नाही आणि कधीही आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी काहीही केले नाही, अशी टीकाही मायावतींनी केली.
कॉंग्रेस पक्ष दलित आणि आदिवासींच्या हिताशी खेळतो आहे. या पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळेच हा पक्ष आज राज्य आणि केंद्रातीलही सत्तेतून बाहेर आहे. कॉंग्रेस पक्ष जेंव्हा केंद्रात आणि बहुतेक राज्यांमधील सत्तेत होता, तेंव्हा अत्यंत जातीयवादी आणि दलित, आदिवासी अन्य मागासवर्गीयांच्या विरोधी होता. कॉंग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिले नाही. कांशीराम यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटाही जाहीर केला नाही. कॉंग्रेस पक्षाने मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणीही केली नाही, अशी टीकाही मायावतींनी केली.
2012 ते 2017 दरम्यान अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये दंगेखोर आणि गुंडांचेच राज्य होते. सपा केवळ एका विशिष्ट समाजासाठी काम करते. त्या पक्षाच्या कार्यकाळात परिस्थिती नेहमीच तणावपूर्ण असायची, असे मायावती म्हणाल्या,
मायावतींनी भाजपलाही जातीयवादी म्हणून संबोधले आहे आणि संघाच्या इशाऱ्यावर पक्ष काम करतो, अशी टीका केली. भाजपने दलित, आदिवासी, मुस्लिमांसाठीच्या योजना बंद केल्या. आरक्षण आणि लाभ भाजपच्या राज्यात दिले जात नसल्याचीही टीका त्यांनी केली.