नवी दिल्ली – “भाषा’ हा आज लोकांना एकत्र आणणारा मूलभूत दुवा असल्याचे निरीक्षण उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी नोंदवले आहे. मातृभाषेचे रक्षण आणि जतन करण्याची मोहीम ही देशातील लोकचळवळ झाली पाहिजे असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने चेन्नईहून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी आभासी माध्यमातून मार्गद्शन केले. आपल्या काळातील बदलत्या गरजांनुसार भाषा तयार घडण्याचे आणि तरुण पिढीमध्ये त्यांचा प्रचार करण्यासाठी सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
भारतात शेकडो वर्षांमध्ये असंख्य भाषा एकमेकांच्या बरोबरीने भरभराटीला आल्याचे निरीक्षण नोंदवत, त्यांचा समान दर्जा आणि वेगळी ओळख दर्शवणाऱ्या ‘प्रादेशिक भाषा’ या ऐवजी ‘भारतीय भाषा’ असा उल्लेख करावा असे उपराष्ट्रपतींनी सुचवले.
शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवण्यासाठी आणि आपल्या युवा शक्तीची क्षमता पूर्णपणे खुली करण्यासाठी भारतीय भाषांमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम आणण्याच्या गरजेचा उपराष्ट्रपतींनी पुनरुच्चार केला.
वसाहतवादी राजवटीने आपल्या भाषांचे नुकसान केले आहे, असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही आपण आपल्या भाषांना न्याय देण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. मातृभाषेला रोजगार आणि उपजीविकेशी जोडण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.