शिवथर – सातारा तालुक्यातील वडूथ, वाढे परिसरात सोमवारी (दि. 20) सायंकाळी झालेल्या वळिवाच्या धुवाँधार पावसाने शेत शिवारात आणि रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. सातारा-लोणंद मार्गावर वाढे आणि वडूथ येथील पुलांवर पाणीच पाणी झाल्याने, वाहनचालकांना कसरत करावी लागली.
वडूथ परिसरात काल (दि. 20) सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटात पावसाने दमदार सुरुवात केली. वार्यामुळे वाढे गावच्या हद्दीत दोन झाडे पडल्याने वाहतूक काही वेळ संथगतीने सुरू होती.
वेण्णा नदीवरील पुलावर पाणी साचल्याने वाढे फाट्यापासून वाहनांची मोठी रांग लागली होती. दोन्ही पुलांवरील पाण्याचा निचरा होणारी आउटलेट पूर्ववत करण्याचा प्रयत्न युवकांनी केला; परंतु मुसळधार पावसामुळे युवकांना यश आले नाही. हा मार्ग भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यतारित असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, या मार्गावरील अडचणी संदर्भात भारतीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला आहे. या मार्गाचे काम लवकरात लवकर करण्याची सूचना त्यांना दिली आहे.