पिंपरी -लहान मुलींवर होणारे अत्याचार बंद व्हावेत यासाठी शासनाने जरब बसेल असा कायदा आणावा, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली आहे. दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयातील गणरायाचे दर्शन घेण्यासाठी माजी नगरसेविका आशा शेंडगे आणि सीमा सावळे आल्या होत्या. या वेळी बोलताना आशा शेंडगे म्हणाल्या, नव्याने निवडून आल्यावर नागरिकांसाठी खूप काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते.
याच इच्छेतून मी आयुक्तांसोबत पाण्याबाबत बैठक सुरू असताना तात्कालीन आयुक्त पाणी पीत असताना मी त्यांच्यावर रागविले होते. मात्र ती माझी चूक होती. मात्र त्यांनी मला खूप मोलाचा सल्ला दिला. तुम्ही नवीन आहात. त्यामुळे बोलताना अभ्यास केल्यावर ते अधिक प्रभावीपणे मुद्दा मांडू शकाल. त्यांचा हा सल्ला आजही मला कामाला येत आहे. स्थायी समितीमध्ये चुकीच्या गोष्टी थांबविण्याचा प्रयत्न केला. सत्तेत असताना 128 कोटींची कामे केली. देशाचे राजकारण सुस्थितीत चालवे, हेच मी गणरायाला साकडे घालेन.
सावळे म्हणाल्या, पारदर्शी कारभारासाठी पत्रकारांना स्थायी समितीच्या बैठकीत बसण्याची परवानगी दिली. पूर्वी 31 मार्च हा कागदावर असायचा. आशिष शर्मा यांनी लॉकिंग बजेट आणले. त्यामुळे 325 कोटी रुपये वाचले. बॅंकेतील ठेवीसाठी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून निविदा मागविल्या. त्यातून 100 कोटी रुपये व्याज मिळाले. कोणतीही करवाढ न करता महापालिकेच्या उत्पन्नात वाढ केली. मोदींजीचे स्वप्न होते की 22 लाख लोकांना घरे द्यायची. त्यापैकी साडेसहा हजार नागरिकांना घरे दिल्याचे समाधान आहे. महिलांवरील अत्याचार कमी होऊन आरोपींना शासन व्हावे. असा कायदा आणावा की त्या कायद्याची जरब बसली पाहिजे.