स्वयंपाकघरातून थेट राजकारणात
जेव्हा एखादी गृहिणी स्वयंपाक घरातून थेट राजकारणाच्या प्रांतात येऊन साताऱ्याची नगराध्यक्ष होते तेव्हा इतिहास घडतो. नगराध्यक्षा माधवी कदम अस या स्वयंसिध्देच नाव आहे. दोन मुलं डॉक्टर नवरा असा छान चौकोनी संसार यांच्या पलीकड काहीच माहित नसणाऱ्या माधवी ताईंच्या हातात त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांसह सातारा शहराची सूत्र आली. ती जबाबदारी सोपवली होती दस्तुरखुद्द उदयनराजे भोसले यांनी.
नवी जबाबदारी, नवे वातावरण, सोबत पती डॉक्टर संजोग कदम यांची भक्कम साथ अशा विश्वासाच्या जोरावर त्यांनी सातारा शहराच्या विकासासाठी पदर खोचला. लोकांमध्ये मिसळल्याशिवाय त्यांच्या समस्या समजणार नाहीत. यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी या मोहिमेतून सगळे शहर माधवीताईंनी पिंजून काढले. नगरपालिका अधिनियम 1965 समजून घेताना कामाच्या पद्धती त्यांनी अंगवळणी पाडून घेतल्या आहेत.
राजवाडा परिसराचे सुशोभिकरण, मोती तलावाचे अद्ययावतीकरण, नगर पालिकेतही लोकशाही दिन साजरा करण्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या महत्वाकांक्षी योजना आहेत. साताऱ्यात गेल्या अडीच वर्षात झालेल्या विकास कामांमध्ये नगराध्यक्ष माधवी कदम यांनी समन्वयकाची भूमिका समर्थपणे पार पाडली. घरी नाही लोकांसाठी सतत कार्यालयात उपलब्ध रहायचे, हा डॉ. संजोग कदम यांचा दंडक माधवी कदम यांनी नेहमीच पाळला आहे. गेल्या अडीच वर्षात सातारा विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याचे नगराध्यक्ष माधवी कदम यांचे स्वप्न आहे.
साताऱ्याची “हिरकणी’
साताऱ्याच्या क्रीडा विश्वात शाहू स्टेडियमच एक आगळं वेगळ महत्व आहे. तसेच सातारा शहरात मध्यवर्ती प्रॅक्टिस ग्राउंड म्हटलं की हमखास गुरुवार पेठेतील शिर्के शाळा मैदानाची आठवण येतेच येते. या मैदानाच्या विकसनासाठी साताऱ्याची लेक मेहनतीने झटली, ही हिरकणी आहे.
साताऱ्याच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सुजाता सागर राजेमहाडिक, सांस्कृतिक व क्रीडा विभाग समितीच्या त्या प्रमुख आहेत. थांबा, यादी इथेच संपत नाही काम प्रचंड आहे, साताऱ्याच्या या नवदुर्गेन आपलं नाणं खणखणीतपणे सिध्द केले आहे. शिर्के शाळा मैदानावर आता राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा भरतात. मात्र त्यामागे मैदान विकसनाची मोठी संघर्ष कथा आहे. या प्रत्येक संघर्ष टप्प्यावर ही नवदुर्गा कसोशीने उतरली.
भवानी पेठेतील विस्तारीत भाजी मंडई असो की जुन्या नगरपालिकेतील बहरलेलं कलादालन असो सुजाता राजे महाडिक यांची सौंदर्यदृष्टी उठून दिसते. अत्यंत हलाखीच्या दिवसातून एका सुस्थिर भविष्याकडे जाणारा राजेमहाडिक दाम्पत्यांचा प्रवास आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करताना राजेमहाडिक प्रत्येक जबाबदारीवर खऱ्या उतरल्या आहेत. स्मिता व सुजाता ही आवळ्या जावळ्यांची जोडी साताऱ्यात प्रसिद्ध आहे. समाजकारणात दोघीही एकत्र खांद्याला खांदा लावून काम करतात. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा तसेच नाट्याविष्काराचे नवनवीन प्रयोग या सर्व गोष्टींना सुजाता राजेमहाडिक हे एकच नाव कारणीभूत आहे.
इंटिरिअरच्या व्यवसायात रमणाऱ्या डॉक्टर
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. रुपाली देशमुख यांनी गेल्या दहा वर्षात अश्वमेघ इंटिरिअर्सची पाळेमुळे साताऱ्यात घट्ट रोवायला मोठे योगदान दिले आहे. पती प्रताप देशमुख, डोक्यात सतत नवनिर्मिती आणि रचनेच्या संकल्पना आणि परिपूर्णतेचा टोकाचा आग्रह या चौकटीत सामावताना डॉक्टरकी बाजूला ठेवणाऱ्या रूपाली देशमुख अनुभवाने पक्क्या बिझनेस वूमन झाल्या आहेत.
अश्वमेघ इंटिरिअर्सचे मोठे आऊटलेट सातारा एमआयडीसी येथे सक्रिय आहे. या युनिटची शंभर टक्के जबाबदारी रूपालीताई यांनी स्वीकारली आहे. येथे तब्बल चाळीस कामगार कार करतात मटेरियल ऍसेंबलिंग, कन्स्ट्रक्शन, तसेच मालाची डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा व सफाईदार व्यावसायिकपणा ही “अश्वमेध’ची वैशिष्ट्य आहेत. ही व्यावसायिक मूल्ये तयार करण्यामध्ये रूपालीताईंनी कधीच कसूर केली नाही.
दोन जुळ्या मुली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या नवऱ्याची काळजी आणि प्रत्यक्ष चाळीस माणसांचा अश्वमेघ परिवार पण काळजी नसावी रूपाली नावाची हिरकणी तिथे खमकेपणाने उभी आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रुपाली देशमुख यांनी आपल्या व्यवसायाची फारशी काळजी न करता पूर्णपणे नवऱ्याच्या व्यवसायात झोकून दिले. विशेष म्हणजे केवळ झोकूनच दिले नाही तर स्वत:ला सिद्धही केले. अश्वमेघ इंटिरियर हे नाव केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून परराज्यासह देशाबाहेरही नावारुपाला आले आहे.
सामाजिक वर्तुळातील उज्ज्वल नाव
साताऱ्यात विकास कामांचा हिशोब मांडला तर महिला नगराध्यक्षांच्या रांगेत स्मिता चंद्रशेखर घोडके हे नाव आपसूकपणे समोर येते. अडीच दशकापूर्वी कोल्हापूरची लेक साताऱ्याला सासूरवाशीण म्हणून आली आणि येथे येऊन तिने तिचा लढवय्या पिंड सिद्ध केला. नक्षत्र या सामाजिक संस्थेत आदरणीय श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या समवेत सामाजिक उपक्रमांमध्ये स्मिता घोडके यांनी विलक्षण धडाडी दाखवली.
घरचा सुवर्ण अलंकाराचा व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कामाचा भला मोठा डोंगर अशी त्रिस्थळी यात्रा घोडके यांना नवीन नाही. त्यांच्या प्रत्येक कामात पती चंद्रशेखर घोडके यांची भक्कम साथ असते. नगराध्यक्ष म्हणूनही 2014-16 त्यांची कारकिर्द विलक्षण गाजली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या कट्टर समर्थक या नात्याने त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. सोनगाव कचरा डेपोचे अद्ययावतीकरण, पंचपाळी हौद सुशोभिकरण, मटण मार्केटच्या स्वतंत्र इमारतीचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून त्यांनी अनेक विकासकामे तडीस नेली. सातारा पालिकेत त्या सातारा विकास आघाडीच्या धडाडीने सभागृह नेत्या म्हणून सक्रीय आहेत. वर्तमान लोकसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी हिरहिरीने उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. संसारात सहज रमणारी ही स्वयंसिद्धा साताऱ्यात घोडके परिवाराचे नाव साताऱ्याच्या सामाजिक वर्तुळात उज्ज्वल करत आहे.
महिला सबलीकरणासाठी झटणारी स्वयं”सिद्धी’
मनाची अंतःस्थ कणव आणि समाजासाठी अखंड झटणारी आणि त्यांच्यावर आईसारखी माया लावणारी माणसं ही विरळीच.
शाहूनगरीच्या पंचक्रोशीत भुकेल्याला घास, गरजवंताला वस्त्र आणि बेघरांना हक्काचा निवारा मिळवून देणाऱ्या आणि शहरातील सहा हजार कष्टकरी महिलांची आईच बनलेल्या भाजपच्या नगरसेविका सिध्दी पवार यांचे कर्तृत्व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकच झळाळून उठते.
सिध्दी पवार यांचे गेल्या बारा वर्षांपासून सक्रीय असणारे जिजाऊ फाऊंडेशन साताऱ्यातील गरजू व कष्टकरी महिलांचे हक्काचे आश्रयस्थान आहे. कोणता गाजावाजा नाही की कसला प्रसिद्धीचा डामडौल नाही, डोक्यात फक्त समाजातल्या वंचित घटकांची आईच्या नात्याने काळजी घेण्याचा आंतरिक स्वभाव सिध्दी पवार यांचा आहे.
जिजाऊ परिवाराचा भक्कम आधारवड यांनी महिलांचे 103 मेळावे घेतले. गेल्या बारा वर्षात तब्बल पाचशेहून अधिक विविध उपक्रम जिजाऊचा अखंड वाहणारा जिव्हाळा असा चौफेर पसरत चालला आहे. मातृत्व आणि कर्तृत्व यांचा मनोहारी संगम सिद्धी पवार यांच्यामध्ये आहे. समाजात उपेक्षित राहिलेल्या वर्गाची माऊली बनण्यात विलक्षण समाधान आहे. आपल्या समाजातील वंचित चिमण्या पाखरांना आईची माया मिळावी व मानवी हक्क मिळावेत, अशी प्रामाणिक भावना सिध्दीताई “दैनिक प्रभात’शी बोलताना व्यक्त करतात.
राजकारण अन् समाजकारणातील एक ध्येयवादी व्यक्तीमत्व
कोणताही राजकीय वारसा नसताना थेट जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या महिल्यांमधील एक नाव म्हणजे मधुताई कांतीलाल कांबळे. मनात पहिल्यापासून समाजसेवा करण्याची त्यांची इच्छा. तसेच आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनाशी धरुन ताईंनी राजकारणात प्रवेश केला. याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांना संघटीत करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे मोलाचे कामही त्यांनी केले.
खेड पंचक्रोशीतील 50 महिलांना शिक्षणाची आवड निर्माण करुन त्यांना दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यातही त्यांचे मोलाचे योगदान. बचत गटाच्या माध्यमातून असंख्य महिलांना मार्गदर्शन करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. समाजसेवा करीत असताना अचानक संधी आल्यामुळे राजकारणात प्रवेश केला. राजकारणामध्ये 2017 ला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवून विजयी होवून सदस्य झाल्या. त्यानंतर खेड पंचक्रोशीतील नागरिकांच्या/महिलांच्या समस्या, अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
10 वीत असताना शिक्षण करीत असताना राजकीय परीक्षा दिली. त्यावेळी 10 वी च्या परीक्षेबरोबर निवडणुकीचाही निकाल लागला व एकाचवेळी दोन्ही परीक्षा पास झाल्या. दहावीत असताना लोक त्यांना कशाला शाळेत जाते, कशाला शिकतेश, मुलीने फक्त चूल व मुल एवढंच सांभाळावे असे टोमणे मारत असत. मात्र त्या गोष्टीकडे लक्ष न देता त्या आपल्या ध्येयावर तेव्हाही ठाम राहिल्या आणि आजही आहेत.