शिलॉंग – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या मेघालयातील प्रचारात कॉंग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी प्रथमच सहभागी झाले. कॉंग्रेसच्या प्रचारासाठी शिलॉंगमध्ये सभा घेऊन त्यांनी भाजपबरोबरच तृणमूल कॉंग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
सर्व काही आपल्यालाच समजते अशा तोऱ्यात भाजप असतो. त्या पक्षाला इतर कुणाविषयी आदर वाटत नाही. एकत्रितपणे त्या पक्षाशी लढावे लागेल. सर्व राज्यांवर एकच संकल्पना, एकच विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत आहे. देशातील सर्व संस्थांवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या विचारसरणीचा घाला घालत आहेत. सर्वांना तृणमूलचा इतिहास ठाऊक आहे. त्या पक्षाची सत्ता असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, घोटाळे होत आहेत.
याआधी तृणमूलने गोव्यातील निवडणुकीसाठी मोठा खर्च केला. त्यामागे भाजपला मदत करण्याचा उद्देश होता. मेघालयमध्येही भाजपची सत्ता यावी यासाठी तृणमूल येथील निवडणूक लढवत आहे, असा दावा राहुल यांनी केला. मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड के.संगमा यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीलाही त्यांनी लक्ष्य केले.