धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
कालव्यातून विसर्ग
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाऊस थांबल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, पुढे होणारा पाऊस लक्षात घेऊन धरणातील पाणी नियंत्रणात ठेवण्यासाठी मुठा उजवा कालव्याद्वारे 1 हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर हे पाणी आणखी काही दिवस सुरूच ठेवण्यात येणार आहे.
पुणे – खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात तुरळक पाऊस झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने पाणीसाठा 13.17 टीएमसी झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा 13.22 टीएमसी होता.
शनिवारी दिवसभरात या चारही धरणांच्या क्षेत्रांत तुरळक पाऊस झाला. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणात 0 मिमी, पानशेत आणि वरसगाव धरणात प्रत्येकी 2 मिमी तर टेमघर धरण परिसरात 4 मिमी पाऊस झाला. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने अद्यापही ओढे आणि नाल्यांमधून धरणात काही प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. शनिवारी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणात 1.97, पानशेत-5.35 टीएमसी, वरसगाव- 4.99 टेमघर- 0.85 टीएमसी पाणीसाठा होता.