पिंपरी – शहरात सुरू असलेल्या पाणी कपातीनंतर दुसऱ्या दिवशी केला जाणारा पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये सुधारणा करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.
येत्या पावसाळ्यापर्यंत शहराला पाणी पुरवठा करता यावा, याकरिता शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. त्यानुसार शहराच्या विविध भागांमध्ये आठवडाभरातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. त्याचे विभागवार नियोजन देखील जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नागरिकांनी देखील या दिवशी पाण्याचा काटकसरीने वापर सुरु केला आहे. मात्र, कपातीनंतर दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा अपुऱ्या दाबाने होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण लडकत म्हणाले की, पाणीकपातीनंतर दुसऱ्या दिवशी सर्वच भागात पाण्याची मागणी सहाजिकच वाढते. त्यामुळे काही प्रमाणात उंचावर असलेल्या रहिवासी भागात पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामध्ये सुधारणा केली जाईल.