मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बोपोडी, औंध भागात प्रचार यात्रा
पुणे – स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्म समभाव, माणूस म्हणून समानता हे सर्व हक्क जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाल्या दिलेल्या घटनेने दिले आहेत. मात्र, केंद्रातील मोदी सरकार ही घटनाच बदलण्याचे षड्यंत्र करत आहे. त्यामुळे भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पुन्हा निवडणुका होणार नाहीत, अशी भीती नगरसेवक अविनाश बागवे यांनी व्यक्त केली.
आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ बोपोडी, औंध भागात प्रचार यात्रा घेण्यात आली. या प्रचार यात्रेचा समारोप कस्तुरबा इंदिरा वसाहत येथे झाला. त्यावेळी बागवे बोलत होते. प्रचार यात्रेला मानाजी बाग बोपोडी येथून प्रारंभ झाला. कस्तुरबा इंदिरा वसाहत येथे समारोप झाला. औंध गाव चौकात माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, संगीता गायकवाड, कैलास गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या प्रचार यात्रेत आमदार अनंतराव गाडगीळ, दीप्ती चवधरी, मनीष आनंद, श्रीकांत पाटील, आनंद छाजेड, वीरेंद्र किराड, शलाका पाटील, शांताराम कुंजीर, शैलेजा खेडेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बागवे म्हणाले, भाजपचा हा डाव उलथून लावण्यासाठी कॉंग्रेस सत्तेवर येण्याची गरज असून पुणे लोकसभा मतदार संघाचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांना निवडून आणणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात पदयात्रा
आपला देठ अजून हिरवा असल्याचे जाहीर समारंभात कौतुकाने सांगणाऱ्या पुण्याच्या पुढाऱ्याला संसदेत पाठवण्याऐवजी तमाशाच्या बारीला पाठवणे अधिक शोभून दिसेल, अशी बोचरी टीका आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली. गुरुवारी वडगावशेरी विधानसभा मतदार संघात प्रभाग क्रमांक 2 व 6 मध्ये आयोजित पदयात्रेच्या समारोपानंतर ते बोलत होते. या पदयात्रेचे आयोजनात माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे आणि किशोर विटकर आदींचा विशेष पुढाकार होता.
येरवडा परिसरात भाजी मंडई व आसपासच्या परिसरात नागरिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. पर्णकुटी चौक येथून पदयात्रेस प्रारंभ झाला आणि विश्रांतवाडी चौक येथे समाप्त झाली. या पदयात्रेत सुनील मलके, संगीता देवकर, राजेंद्र खांदवे, भगवान जाधव, राजेंद्र कांबळे, नाना नलावडे, जॉन पॉल, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर मोझे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कचेरीचे उल्हास पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पर्वती विधानसभा मतदार संघातील सेंटर पॉइंट, मित्र मंडळ चौक येथील कचेरीचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अश्विनी कदम, सुनिता मोरे, शहराध्यक्ष रमेश बागवे, विजयकांत कोठारी, उल्हास पवार, अभय छाजेड आदी उपस्थित होते. तसेच, महात्मा फुले जयंतीनिमित्त जोशींनी महात्मा फुले वाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी शहर कॉंग्रेस सरचिटणीस अजित दरेकर आदी उपस्थित होते.