पुणे, दि. 13 – शहरातील पाणी पुरवठ्यासाठी व्हॉल्व सोडणे, टॅंकरने पाणी देणे तसेच दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे महापालिका खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून करते. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनेक कामांना वित्तीय समिती तसेच इतर आवश्यक मान्यता न घेताच या ठेकेदरांकडून कामे करून घेण्यात आली आहेत. आता या बिलांसाठी ठेकेदारांनी तगादा लावला आहे. लेखापाल विभागाने ही बिले देण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची कोंडी झाली असून, बिले न मिळाल्यास या ठेकेदारांनी काम थांबविल्यास ऐन सणासुदीत शहरात “पाणीबाणी’ची स्थिती उद्भवणार आहे.
शहरातील पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे असून, शहरात पाणीपुरवठ्याचे सहा झोन आहेत. याअंतर्गत सुमारे 400 ते 500 व्हॉल्वमन पाणी सोडण्याचे काम करतात. महापालिका खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम करून घेते. तसेच तातडीच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही महापालिका करते. याशिवाय शहरात ज्या भागात पाणी जात नाही अथवा पाण्याची मागणी वाढते, त्या भागात टॅंकरद्वारे पाणी दिले जाते. यातील काही कामांसाठी महापालिका प्रत्येकी सहा महिन्यांच्या निविदा काढते. त्यामुळे प्रत्येक वेळी नव्याने निविदा काढल्या जातात. निविदा काढल्या तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या इतर मान्यता घेतल्या जात नाहीत, तर निविदांपेक्षा अधिकचे काम करून घेतले जाते. त्यानंतर ही बिले मान्यतेसाठी ठेवली जात आहेत. त्यावर लेखापाल विभागाने आक्षेप घेतला असल्याने पाणीपुरवठा विभागाची कोंडी झाली असून, या बिलांना मान्यता न मिळाल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
ही बाब समोर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या पुढे सहा सहा महिन्यांच्या निविदा न काढता त्या तीन वर्षांच्या काढाव्यात, तसेच पहिली निविदा संपणाच्या तीन महिने आधीच दुसरी निविदा प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश बिनवडे यांनी दिले आहेत. मात्र, सर्वच विभागांची यंत्रणा पालिकेच्या भरती परीक्षेच्या प्रक्रियेत व्यग्र आहे तर नंतर लगेच दिवाळीची सुट्टी आहे, त्यामुळे बिले न मिळाल्यास ठेकेदारांकडून पाणीपुरवठ्याचे काम थांबविले गेल्यास ऐन दिवाळीत पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.