पुणे, दि. 13 – गेल्या काही दिवसांपासून शहराच्या मध्यवर्ती भागासह मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांचा अक्षरशः कोंडमारा होत आहे. अतिक्रमणांमुळे हक्काच्या पदपथांवरही त्यांना थारा उरला नाही. त्यातच अनेक मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सिंग्नलची वेळ दोन ते तीन मिनिटे करण्यात आली असून, काही चौकात सिंग्नलची वेळ अर्ध्या मिनिटाने वाढविण्यात आली आहे. मात्र, हे करताना पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नलची वेळच बंद केली आहे. परिणामी, वाहनांच्या गर्दीत ज्येष्ठ नागरिक आणि शालेय मुलांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.
शहरात सिंहगड रस्ता, स्वारगेट परिसर, कर्वे रस्ता, नगर रस्ता, पुणे विद्यापीठ रस्त्यावर मेट्रोचे तसेच उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. तर, शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये सणांचे दिवस असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. परिणामी, रस्त्यांवर अस्ताव्यस्तपणे करण्यात येत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे रस्ते अरुंद झाले असून, शहरातील रस्त्यारस्त्यांवर दिवसभर कोंडीचेच चित्र दिसत आहे. पावसामुळे आणि देखभाल दुरुस्तीअभावी अनेक सिग्नल बंद आहेत. परिणामी, सकाळी 9 पासून शहरात वाहतूक कोंडी सुरू होऊन रात्री उशीरपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागताहेत. मात्र, या कोंडीत वाहनचालका पेक्षा अधिक मनस्ताप रस्ते ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना करावा लागत आहे.
सप्ताहभरच मान
महापालिका तसेच वाहतूक पोलिसांकडून शहरात पादचारी सप्ताह साजरा केला जातो. मात्र, या सप्ताहापूरताच शहरात पादाचाऱ्यांना मान दिला जात असल्याचे चित्र आहे. वाहतूक कोंडी झाल्यानंतर रस्त्यावर असलेल्या वाहनांकडून जागा मिळेल तिथे वाहने घुसविली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना 12 मीटरचा रस्ता ओलांडण्यासाठी दहा-दहा मिनिटे वाट पाहावी लागत आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
पादचारी सिग्नलच गायब
महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून शहरात स्वारगेट, अलका चौक, खंडोजीबाबा चौक, नळस्टॉप, आरटीओ चौक, सिमला ऑफिस चौक तसेच वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर पादाचाऱ्यांसठी सिग्नल यंत्रणा बसविली होती. मात्र वेगवेगळ्या विकासकामांच्या नावाखाली हे सिग्नलच बंद ठेवले आहेत. ज्या ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी गतिरोधक उभारले होते, ते फोडून त्या खालून पाण्याच्या तसेच ड्रेनेजच्या वाहिन्या टाकण्यात आल्या असून, नंतर हे रस्ते तसेच सोडून देण्यात आले आहेत, तसेच हे पादचारी मार्ग रस्त्यावर केले असले तरी त्यासाठी माहिती फलकही लावले नाहीत.