पुणे – खडकवासला धरण साखळीतील पाण्याचे नियोजन करण्यासाठी शनिवारी कालवा समितीची बैठक होत आहे. पाणी वापर जास्त असल्याने पालिकेने पाणी वापर कमी करावा, अशी सूचना पाटबंधारे विभाग वारंवार करत आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट ओढावणार का, हे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत निश्चित होणार आहे. शहरात उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.
मात्र, राज्य शासनाने मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी पुणे शहरास वापरले जात असल्याने जलसंपत्ती नियामक प्राधिकरणात महापालिकेविरोधात दावा सुरू आहे. यावेळी प्राधिकरणानेही महापालिकेने मंजूर कोट्याप्रमाणेच पाणी वापरावे, असे आदेश दिले आहे. पए, तरीही पालिकेचा पाणी वापर जास्त होत आहे. उन्हाळी पाण्याचे नियोजन लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने पाणी वापर कमी करण्याची सूचना पाटबंधारे विभागाकडूनही केली जात आहे.
पालिका पाणी वापर कमी करत नसल्याने पाटबंधारे विभागाने खडकवासला जॅकवेलच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात पंपच बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे तत्कालिन सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेत पुण्याचे पाणी कमी करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चारही धरणांमध्ये शिल्लक पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पुन्हा कालवा समितीची बैठक होत आहे.
यंदा पाणीसाठा कमी
मागील वर्षी खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांत सुमारे 17.2 टीएमसी पाणी होते. यंदा हे प्रमाण 15.38 टीएमसी आहे. तर महापालिकेस जूनअखेर सुमारे साडेचार टीएमसी पाण्याची आवश्यकता असेल. यंदाचा उन्हाळा पाहता सुमारे 2 टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. तर, खडकवासला कालव्यातून सध्या शेतीच्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. ते संपल्यानंतर उपलब्ध पाणीसाठ्यावर शहराचा पाणीपुरवठा आणि उन्हाळी आवर्तनाबातचा निर्णय होण्याची शक्यता आहे.