घोडनदीवरील बंधाऱ्यात आठवडाभराचाच साठा ः कुकडी प्रल्पातून पाणी सोडण्याची मागणी
शिरूर-शिरूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घोड नदीवरील कोल्हापुरी बंधारा पूर्णपणे आटला असून या बंधाऱ्यात केवळ सहा ते सात दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शिरूर शहरावर पुन्हा करोना व्हायरस बरोबर पाणीटंचाईचे संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यात राहिलेल्या पाण्यावर या भागात असणारे शेतकरी त्यांची पिके वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करीत आहेत, त्यामुळे राहिलेले पाणी सहा दिवस टिकेल का नाही, याची भीतीही शिरुर नगर परिषदेला आहे.
शिरूर शहराला पाणीपुरवठा करणारा एकमेव असलेला कोल्हापुरी बंधारा आटला असल्याने आज मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्वतः जाऊन बंधाऱ्याची पाहणी केली. शहराला रोज 72 लाख लिटर पाण्याची गरज आहे. नगर परिषदेच्या वतीने एक महिन्यापूर्वी शिरूर कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडावे, अशी मागणी कुकडी प्रकल्प अभियंता यांना पत्राद्वारे केली आहे; परंतु अद्याप पाणी सोडले नाही. पाणी टंचाई झाली तर टॅंकरने पाणी पुरवत असताना सोशल डिस्टंसिंग पाळला जाणार नसल्याची ही भीती आहे. सध्या बंधाऱ्यात असणारे पाणी पूर्णपणे हिरवट व शेवाळ युक्त आहे. शहराला लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार, सभागृहनेते प्रकाश धारिवाल व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी शासन पातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.
मागील वर्षी जवळपास 13 ते 15 दिवस ऐन उन्हाळ्यात पाणी मिळाले नसल्याने शिरूर शहरात पाणी बाणी झाली होती. नदीपात्रातून पाणी सोडले तर एकूण 27 बंधारे पूर्णपणे भरले जातात, त्यानंतर शिरूर शहराला पाणी मिळत आहे. सध्या हे पाणी सुटल्याचे नगरपरिषद सांगत आहे व चार ते पाच दिवसांत पाणी शिरूर शहरात येईल असे आश्वासनही देण्यात येत आहे. कुकडी डावा कालवा 61तून पाणी सोडल्यास हे पाणी तीन ते चार दिवसांत शिरूर शहरातील बंधाऱ्यात पोहोचते.
- कुकडी कालव्यातून पाणी मिळावे यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहारात स्मरणपत्र कुकडी प्रकल्प अभियंता यांना नुकतेच दिले आहे. शिरूर नगरपरिषदेत मिळणारे पाणी नदीवाटे नको ते पाणी कालव्यामार्फतच मिळावे, अशी मागणी नगरपरिषदेने केली आहे. डिंभे धरणातून घोड नदीतून पाणी सोडण्यात आले असून ते अण्णापूरपर्यंत आल्याचे समजते.
-भगवान दळवी, पाणीपुरवठा प्रमुख शिरुर नगरपरिषद - शिरूर शहराला लवकरात लवकर पाणी मिळावे, यासाठी आमदार अशोक पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पाणी लवकरच मिळेल अशी आश्वासनही आमदार पवार यांनी दिले आहे.
-रवींद्र खांडरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस वकील सेल - शिरूर शहराला नदीपात्रातून सोडलेले पाणी तीन ते चार दिवसांत येणार आहे. आमदार अशोक पवार यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे शिरुर शहराला पाणीटंचाई होणार नाही.
-मुजफ्फर कुरेशी, सभापती नळ पाणीपुरवठा