नवी दिल्ली: भारतातील करोनाबाधितांमध्ये या आजाराची लक्षणेच दिसत नाहीत व ही चिंतेची बाब असल्याचे भारतीय विज्ञान परिषदेचे अर्थात आयसीएमआरचे शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची बाधितालाही कल्पना नसते, आणि अशा 80 टक्के केसेस भारतात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतात आतापर्यंत 17 हजार जणांना करोनाची लागण झाली असून 543 जणांचा सोमवार सकाळपर्यंत मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर 80 टक्के रूग्णांत लक्षणेच न दिसण्याची माहिती समोर येणे ही काळजी वाढवणारी बाब आहे. या अशा बाधितांना शोधून काढणे हेच एक मोठे दिव्य काम असणार आहे. त्याला कारण एखादा पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यावर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना ट्रेस केले जाते. त्यांची तपासणी केली जाते. तेव्हाच अन्य कोणाला लागण झाली आहे, ही माहिती समोर येते. जर कोणाला लक्षणेच दिसत नसतील तर संबंधित रूग्णालाही तो करोनाचा वाहक असल्याचे लक्षात येत नाही, व त्याच्यामार्फत या विषाणूचा अन्यत्र प्रसार होत राहतो व ही अत्यंत धोक्याची स्थिती आहे. सध्याच्या स्थितीत प्रत्येकाची टेस्ट करणे सर्वथा अशक्य असल्याचेही गंगाखेडकर यांनी नमूद केले.
दरम्यान, भारतात बाधितांची संख्या फार वेगाने वर जाणार नाही. मात्र तरीही मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आपण परिस्थितीचे योग्य मूल्यमापन करू शकतो, असे त्यांनी नमूद केले. रूग्णां लक्षणे न दिसण्याचे प्रमाण चिंता वाढवणारे कसे आहे, हे दिल्लीतील उदाहरणावरूनही अधोरेखित होत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अलिकडेच साधारणत: 736 जणांची चाचणी घेण्या आली होती. यातील 186 जणांना विषाणूची बाधा झाल्याचे चाचणीतून आढळून आले. मात्र स्वत: रूग्णांना आपल्याला करोनाची लागण झाली असल्याची कल्पना नव्हती. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरतो आहे. कारण लक्षणे नसणाऱ्या अशा व्यक्तींकडूनच त्याचा नकळतपणे प्रसार होत आहे.