देहूगाव: आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र देहूनगरीतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. तपोनिधी नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 334 वे वर्ष आहे. यानिमित्ताने देहूत पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ग्यानबा-तुकारामाचा अखंड जयघोष सुरू असून, सर्वत्र हरिनाम आणि भागवत धर्माच्या पताकांचे वातावरण आहे. रविवारच्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरल्यामुळे भाविकही सुखावल्याचे पहावयास मिळाले. इंद्रायणी नदीकाठ, मुख्य मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर गर्दीने फुलला आहे.