वडगाव मावळ – कोकण रायगड येथून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त निघालेल्या पायी दिंडीत मालवाहू पिकअप वाहन घुसले. पुणे-मुंबई महामार्गावर साते फाटा (ता. मावळ) येथे शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर अन्य 23 वारकरी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात हलविण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सविता वाळकू येरम (वय 55, उंबरे, ता. खालापूर, जि. रायगड) आणि जयश्री आत्माराम पवार (वय 55, रा. भूतीवली, ता. कर्जत, जि. रायगड), विमल सुरेश चाेरघे (वय ५०, रा. खालापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत.
जखमी वारकऱ्यांमध्ये मंदा बाबू वाघमारे (वय 25, रा. उंबरे), वनिता बबन वाघमारे (वय 35, रा. उंबरे), रंजना गणेश वाघमारे (वय 32, रा. पाली), राजश्री राजेश सावंत (वय 35, रा. खोपोली), सुरेखा तुळशीराम करनुक (वय 60, रा. बीड खुर्द), वंदना राम करनुक (वय 60, रा. बीड खुर्द), माणिक बळीराम करनुक (वय 80, रा. बीड खुर्द), दिव्या दीपक चांदुरकर (वय 42, रा. उरण), आशा अनंता साबळे (वय 50, रा. वडप), शारदा चंद्रकांत अहिर (वय 60, रा. उंबरे), सुमित्राबाई बबन चोरघे (वय 65, रा. बीड खुर्द), पुष्पांजली दिलीप करनुक (वय 65, रा. खोपोली), सुभद्रा सीताराम शिंदे (वय 70, रा. खोपोली), बेबी रामदास सावंत (वय 49, रा. कर्जत), सुनंदा सदाशिव चोरघे (वय 50, रा. बीड खुर्द), रंजना अशोक करनुक (वय 55, रा. बीड खुर्द), राधिका बाळकृष्ण भगत (वय 40, रा. बीड खुर्द), पुष्पा गणपत पालकर (वय 40, रा. बीड खुर्द), अनुसया बंडू जाधव (वय 45, रा. उंबरे), शोभा चंद्रकांत सावंत (वय 55, रा. साळवट), अनुसया मधुकर जाधव (वय 55, रा. बीड खुर्द), बेबी लक्ष्मण करनुक (वय 56, रा. बीड खुर्द), ताई बबन वाघमारे (वय 50, रा. बीड खुर्द) आदी जखमी आहेत. जखमी सर्व तालुका खालापूर, जि. रायगड येथील रहिवासी आहेत.
या प्रकरणी टेम्पो चालक राजीव चौधरी याला पोलिसांनी तात्काळ अटक केली.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, रुग्णवाहिका व स्थानिक नागरिकांनी जखमींना औषधोपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचे कार्यकर्ते पाठवून दिंडीतील भाविक व जखमींना मदत पाठविली.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मित्तेश घट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक विलास भोसले आदींनी घटनास्थळी व जखमींची विचारपूस केली.
अपघातातील जखमींना कामशेत महावीर हॉस्पिटल, बढे हॉस्पिटल, कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात, सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा असून, या सोहळ्यासाठी खालापूर, उंबरे येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्टची पायी दिंडी कार्तिकी वारीसाठी निघाली होती. दिंडी पुणे-मुंबई महामार्गाने साते फाटा (ता. मावळ) जात होती.
शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पिकअप टेम्पो चालक राजीव प्रमोद चौधरी (वय 30 रा. वाघोली, पुणे) यांने भरधाव टेम्पो पायी जाणाऱ्या दिंडीत घुसला. या अपघातात सविता येरम, विमल चाेरघे आणि जयश्री पवार या तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 23 जण जखमी झाले असून, काही वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळी आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके, सरपंच विजय सातकर, रुपेश गायकवाड, माजी सरपंच संतोष जांभुळकर, पोलीस पाटील शांताराम सातकर, गजानन शिंदे, संदीप कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, विकास सस्ते, पोलीस कर्मचारी अमोल तावरे, संपत वायळ, आदित्य भोगाडे, गणपत होले, अजय शिंदे यांनी भेट देत मदतकार्य केले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते तपास करीत आहेत.