पुणे (विजयकुमार कुलकर्णी)- मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका गव्हाच्या आयात-निर्यातीवर झाला आहे. दोन्ही राष्ट्रांतून होणारी निर्यात थंडावली असून, परिणामी युरोपिय देशांकडून भारतातील गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे मागच्या काही दिवसांत भारतातील गव्हाच्या भावात क्विंटलमागे तब्बल 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. याबाबत माहिती मार्केट यार्डातील व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी माहिती दिली. शिवाय, रवा, सुजी, मैदा आणि आटाच्या भावातही घाऊक बाजारात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांना आता चपातीसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे.
गहू महागण्याचे नेमके कारण काय?
“गव्हाचे कोठार’ असे संबोधले जाणारे युक्रेन आणि रशिया जगभरात 25 ते 30 टक्के गहू निर्यात करतात. हे दोन्ही देश विशेषत: युरोपीय देशांना गहू निर्यात करतात. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे हा पुरवठा बंद झाला आहे. ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. परिस्थिती सुधारली तरीही तेथून गव्हाची निर्यात सुरू होण्यास वेळ लागणार आहे.
निर्यात वाढणार
फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतातून 60 लाख टन गहू निर्यात करण्यात आला. तसेच, मार्च अखेरपर्यंत 70 लाख टन गहू निर्यात होण्याचा अंदाजही सुमीत गुंदेचा यांनी वर्तविला आहे.
भारताची स्थिती काय?
भारतातून तसा विचार केल्यास गव्हाची निर्यात कमी होते. मात्र, मागील दोन वर्षांपासून गव्हाची निर्यात वाढली आहे. त्यात आता युद्ध परिस्थितीमुळे युरोपीय देशांकडून भारतातील गव्हाची मागणी वाढली आहे. वाढलेल्या निर्यातीमुळे गव्हाचे भाव गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. तसेच, गव्हापासून बनणाऱ्या पदार्थांचे भावही तेजीत आहेत.
- गहू, रवा, आटा,
- मैद्याचे भाव वाढले
- स्थानिक बाजारपेठेला युद्धाची झळ
- युरोपीय देशांत निर्यात वाढल्याचा परिणाम
- रशिया आणि युक्रेनकडून निर्यात पूर्णत: ठप्प