नवी दिल्ली -निरीक्षण समितीला आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करत आहोत. मात्र, आता आमचा संयम संपत चालला असून आम्हाला आता न्यायालयाकडून न्याय हवा आहे, अशा भावनिक आवाहन आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंमधील भारताची स्टार महिला खेळाडू विनेश फोगट हिने केले आहे.
आमचे जबाब घेतल्यावर निरीक्षण समितीने त्यावर काय विचार केला ते आता महत्वाचे नाही. आम्ही आमच्या मागण्या मान्य होइपर्यंत हे आंदोलन थांबवणार नाही. ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झालीच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. बाकी पडद्यामागे काय सुरु आहे ते आमच्यासाठी काहीही महत्वाचे नाही आता केवळ आम्हाला न्यायालयाकडून न्याय हवा आहे, असेही विनेश म्हणाली.
या निरीक्षण समितीने काय काम केले किंवा काय अहवाल दिला, हे आता आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. जे झाले तो आता भूतकाळ झाला. समितीचा कार्यकाळ तीन महिन्यांचा होता आणि तो संपला आहे. आता लढाई न्यायालयात गेली आहे आणि आम्हाला तेथूनच न्याय हवा आहे, असे विनेशने निक्षून सांगितले.
आंदोलक कुस्तिगीरांनी गुरुवारी माध्यमांशीही संवाद साधला व ही लढाई निश्चितच जिंकू असा विश्वासही व्यक्त केला. हा लढा केवळ भारतापुरताच मर्यादीत राहिला नसून ही जागतिक लढाई सुरु झाली आहे. केवळ कुस्तीच नाही, तर जगातील अन्य खेळातील खेळाडूंना देखील आमच्या आंदोलनाचे महत्त्व कळेल, असेही विनेशने म्हटले आहे. विनेशसह बजरंग पुनियानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आमची भेट घ्यावी आणि न्याय द्यावा, असे आवाहनही केले आहे.
दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने या कुस्तीपटूंचा दुसऱ्या टप्प्यातही जबाब लवकरच नोंदवला जाणार असल्याचे सांगितले आहे. निरीक्षण समिती या कुस्तीपटूंच्या सातत्याने संपर्कात असून त्यांच्याशी संवादही साधण्याचा प्रयत्न केला
जात आहे.
खाप पंचायतीबाबत बजरंगचे घूमजाव
कोणत्याही राजकीय पक्षाचा तसेच कोणत्याही संघटनेचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही असे काल परवापर्यंत हे कुस्तीपटू सांगत होते. मात्र, केवळ 24 तासांतच त्यांनी ही भूमिका बदलली आहे. आमच्या आंदोलनाची पुढील दिशा जी काही असेल त्यात खाप पंचायतीची भूमिकाही महत्त्वाची राहील असे सांगितले व आपल्याच वक्तव्याबात घूमजाव केल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.
ब्रिजभूषण यांच्या अटकेसाठी आम्ही रविवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर खापचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हालाही मान्य असेल, असेही पजरंग पुनिया व विनेशने म्हटले आहे. त्यामुळे आता या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याचेच चित्र दिसू लागले आहे.