नवी दिल्ली : तामिळनाडूतील वेल्लोर जिल्हा प्रशासनाने आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्याला जोडणाऱ्या तीन महामार्गांवर विटांची भिंत उभारली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गांवर चेक पोस्ट बनवण्यासाठी या भिंती उभारण्यात आल्या आहेत. एका रात्रीत सिमेंटच्या विटांच्या भिंती उभारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पलामन्नार-गुंडीय्यातम मार्ग, चित्तूर-तिरुत्तानी मार्ग आणि चित्तूर-वेल्लोर मार्गावर या भिंती उभारण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी फक्त सिमेंटच्या विटा एकमेकांवर रचून या भिंती बनवण्यात आल्या आहेत. तर पलामन्नारमध्ये अधिकाऱ्यांनी चक्क बांधकाम कामगारांकडून या भिंती बांधून घेतल्याचे एका इंग्रजी वर्तमानपत्राने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. दोन जिल्ह्यांच्या सीमांवर महामार्गांवर भिंती बांधण्याचे काम रविवारी सुरु झाले होते जे काही ठिकाणी अगदी सोमवार संध्याकाळपर्यंत सुरु होते.
यासंदर्भात बोलताना चित्तूरचे उप निरिक्षक वसंता कुमारी यांनी, तामिळनाडूच्या बाजूने तेथील पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी भिंती उभारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत नोंदवले आहे. राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार या भिंती बांधण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. या भिंती बांधण्याआधी अत्यावश्यक सेवा वैद्यकीय मदतीसाठी या चेकपोस्टवरुन वाहनांना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता ते ही बंद करण्यात आलं आहे, असे वसंता कुमारी यांनी इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले आहे.
ग्रामीण भागातील लोकांकडून गुंडीय्यातम आणि वेल्लूर रस्त्यांच्या मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर चित्तूर आणि वेल्लूरमधून जाणारा कुड्डल्लोर महामार्ग हा वैद्यकीय सेवेसाठी महत्वाचा आहे. या महामार्गावरुनच वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला जाता येते. गुंडीपाला, पलामन्नार आणि चित्तूर येथील महसूल अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी नारायण भरत गुप्ता यांनी घेतली असल्याची माहिती दिली आहे. कृष्णानगरी, वेल्लोर, तिरुवल्लूर जिल्ह्यांना लागून असलेली चित्तूर जिल्ह्याची सीमा ही २०० किमीची आहे.