कोलकाता – प. बंगाल विधानसभेसाठी मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. अजून पाच टप्प्यांतील मतदान व्हायचे आहे. याच दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निशाणा साधला आहे.
शहा यांच्या इशाऱ्यावरूनच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अर्थात सीआरपीएफचे जवान मतदारांना त्रास देत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
राज्यात आता 10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होत असून ममतांनी त्याचा प्रचार जोरदार सुरू केला आहे. त्यांनी शहा यांना लक्ष्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. मोदी आणि शहा केंद्र्राच्या तपास संस्थांचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप करताना त्या म्हणाल्या की त्यांनी अगोदर अभिषेकच्या (ममतांचा भाचा अभिषेक बॅनर्जी), नंतर स्टॅलिन यांच्या मुलीच्या घरावर आणि नंतर सुदीपच्या घरावर छापे मारले.
दरम्यान, पंतप्रधानांनीही ममता यांच्यावर आरोप केले आहेत. ममता मुस्लिमांकडे धर्माच्या आधारावर मते मागत आहेत. आम्ही जर असे केले असते तर आम्हाला आतापर्यंत निवडणूक आयोगाची नोटीस आली असती असे ते म्हणाले.