मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र आता एनआयए कोर्टाला दिले जाणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिले होते, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आला आहे.
या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणात आता एनआयए बरोबरच सीबीआयकडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात अनेक गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. 2020 मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितले होते की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. पण ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. पण एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला पुढे ही रक्कम देण्यास सांगितले.
ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावले होते आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितले. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचे सांगत आपण त्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.