11 दरवाजे उघडले
पुणे – खडकवासला धरण परिसरात गुरुवारी दिवसभरात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 16 हजार 247 क्यूसेकने पाणी सोडण्यात येत होते, सायंकाळी पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, बाबा भिडे पूल मध्यरात्री पाण्याखाली गेला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी खडकवासला हे एक धरण आहे. खडकवासला धरण बुधवारी 100 टक्के भरल्याने धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली. बुधवारी 428 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. गुरुवारी सकाळी यामध्ये वाढ करण्यात आली असून खडकवासलातून विसर्ग वाढला
1 हजार 712 क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 5 हजार 136 क्युसेक आणि दुपारी 12 वाजता 7 हजार 276 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. रात्री 16 हजार 247 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
दरम्यान, गुरुवारी दिवसभरात पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात पावसाचा जोर कायम होता. खडकवासला धरणात दिवसभरात 29 मिमी, पानशेतमध्ये 82 मिमी, वरसगावमध्ये 81 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पानशेत धरणसुध्दा 76.50 टक्के भरले आहे. वरसगाव धरण 62.97 टक्के आणि टेमघर धरणात 49.50 टक्के भरले आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 20.04 टीएमसी म्हणजे 68.73 टक्के उपलब्ध आहे. खडकवासला धरणातून विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रात वाहने पार्किंग करू नये, नदीपात्रात कोणी जाऊ नये, फिरु नये, अशा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.