– श्रीपाल ललवाणी
आज बॅ. वीरचंदजी गांधी यांची 156 वी जयंती आहे. शिकागो (अमेरिका) येथे 1893 साली पार पडलेल्या पहिल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत जैन धर्माचे एकमेव प्रतिनिधी म्हणून मुंबईचे वीरचंद राघवजी गांधी सहभागी झाले होते. 29 वर्षांच्या या अभ्यासू युवकाचे सर्वधर्म परिषदेतील योगदान लक्षणीय व कौतुकास्पद असेच होते. पाश्चिमात्यांना जैन धर्माची ओळख करून देणारी पहिली व्यक्ती म्हणून इतिहासाला वीरचंदजी गांधी यांची नोंद घ्यावीच लागेल.
देवावर दृढ विश्वास असणाऱ्या ख्रिश्चन जनसमुदायाला “निरीश्वरवादी’ पण उच्च अध्यात्मिक मूल्ये असणारा जैन धर्म वीरचंद गांधी यांनी अत्यंत समर्थपणे समजावून सांगण्याचे महान कार्य केले.
भारतीय लोकांविषयी जे आक्षेप घेतले गेले त्याला गांधी यांनी अगदी सडेतोड उत्तर दिले. हिंदू लोक, हिंदू धर्म, हिंदू चालीरिती यावरील आक्षेप त्यांनी समर्पकरित्या खोडून काढले. 14 भाषा ज्ञात असणाऱ्या वीरचंदजी गांधी यांचा सर्वधर्म आणि दर्शनाचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्वाची योग्य दखल घेत, अमेरिकेतील अनेक धुरिणींनी आणि वर्तमानपत्रांनी त्यांचे कौतुक केले होते.
सर्वधर्म परिषद संपल्यानंतरही त्यांची विविध ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली. ज्या विविध विषयांवर त्यांनी अमेरिकेत व्याख्याने दिली. त्यातील काही विषय पुढीलप्रमाणे- जैन धर्म, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, भारतीय संस्कार आणि उत्सव, भारताचा इतिहास, भारतीय स्त्रियांचे स्थान, ख्रिश्चन धर्म आणि मांसाहार, प्राणायाम, योग, ध्यानधारणा, संमोहनशास्त्र इत्यादी. वरील विषयांची नामावली पाहिली तरी वीरचंद गांधी यांचा बुद्धीचा व अभ्यासाचा आवाका पाहून थक्क व्हायला होते. दोन टप्प्यांमध्ये एकंदर सात वर्षे त्यांनी अमेरिकेत वास्तव्य केले. विविध व्याख्याने, लेख याद्वारे त्यांनी भारतातील विविध धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, भारताचा समृद्ध वारसा आणि परंपरा यांची पाश्चिमात्यांना ओळख करून दिली. त्यांना तिथे अनेक मित्र व समर्थक लाभले.
1896 साली गांधी अमेरिकेत असताना त्यांना भारतात भीषण दुष्काळ पडल्याचे समजले. त्यांनी तेथे एका दुष्काळ सहाय्यक संस्थेची स्थापना करून 40 हजार रुपये जमा करून भारतात पाठविले. तसेच अन्नधान्यांनी भरलेले एक जहाजही भारतात पाठविले. अशा प्रकारे गांधी यांना आपल्या देशबांधवांविषयी असलेली कळकळ आणि हृदयात असलेली माणुसकी यांचे आनंददायी दर्शन होते.
वीरचंदजी गांधी यांचे भारतातील कार्यही महान होते. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
स्वामी विवेकानंद आणि वीरचंद गांधी यांची चांगली मैत्री होती. प्रगल्भ बुद्धी असलेल्या या दोन तरुणांमध्ये अनेक बाबतीत साधर्म्य होते. स्वामी विवेकानंद यांनी भारतात पाठविलेल्या पत्रात वीरचंद गांधी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. विवेकानंदांप्रमाणेच वीरचंद गांधी हेही अल्पायुषी ठरले. वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी त्यांचे अल्पशा आजाराने भारतात निधन झाले. भारताच्या या थोर सुपुत्रास विनम्र अभिवादन.