लखनौ – शुक्रवारी झालेल्या हिंसक आंदोलनासंदर्भात उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 227 जणांना अटक करण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक केलेल्यांमध्ये 68 जणांना प्रयागराज येथून आणि 50 जणांना हाथरस येथून अटक करण्यात आली आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी आज प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले.
अटक करण्यात आलेल्या उर्वरित लोकांमधील 48 जणांना सहारणपूर. 28 जणांना आंबेडकर नगर, 25 जणांना मोरादाबाद आणि 8 जणांना फिरोझाबाद येथून अटक करण्यात आली आहे, असे ही त्यांनी सांगितले.
भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी प्रयागराज आणि सहारणपूर येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान निदर्शकांनी हल्लडबाजी करत पोलिसांवर दगडफेक केली होती. इतरही काही शहरांमध्ये अशाच प्रकारे हिंसक आंदोलने झाली होती. प्रयागराजमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ देखील केली होती.
पोलिसांचे वाहन पेटवून देण्याचा प्रयत्नही झाला होता. जमावाला पिटाळून लावण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नलकांड्या फोडाव्या लागल्या आणि लाठीमारही करावा लागला होता. बिजनौर, मुरादाबाद, रामपूर आणि लखनौमध्येही असाच स्वरुपाची निदर्शने झाली आणि घोषणाबाजी झाली.