लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौ येथे उत्तर प्रदेशमधल्या गुंतवणूकदारांच्या शिखरपरिषदेचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी 80 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 1406 प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संबंधित, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग, उत्पादन, अक्षय ऊर्जा, औषध, पर्यटन, संरक्षण आणि एरोस्पेस, हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.
20 अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि जागतिक रिटेल इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे. गेल्या वर्षी जगातील 100 हून अधिक देशांमधून 84 अब्ज डॉलरची विक्रमी परदेशी थेट गुंतवणक आली. भारताने गेल्या आर्थिक वर्षात 417 अब्ज डॉलर म्हणजेच 30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची निर्यात करून नवा विक्रम निर्माण केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत सरकारने धोरण स्थिरता, समन्वय तसंच व्यवसाय करणे सुलभ करण्यावर भर दिला आहे, हे त्यांनी निदर्शनास आणले. एक देश-एक कर जीएसटी, वन नेशन-वन ग्रिड, वन नेशन-वन मोबिलिटी कार्ड, वन नेशन-वन रेशन कार्ड, हे प्रयत्न आमच्या ठोस आणि स्पष्ट धोरणांचे प्रतिबिंब आहेत, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले.
उत्तरप्रदेशात देशाच्या एक पंचमांश किंवा एक षष्ठमांश लोकसंख्या रहाते. त्यामुळे विकासावर त्याचा प्रचंड परिणाम घडून येतो. कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीतील सुधारणेमुळे व्यावसायिकांच्या मनात पुन्हा विश्वास स्थापित झाला आहे, उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे आणि राज्यातील प्रशासकीय व्यवस्थांमध्येही सुधारणा झाली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
पीएलआय योजना आणि 7.5 लाख कोटी रूपयांचे वाटप याचा लाभ राज्याला होणार आहे. राज्यातील संरक्षण मार्गिका ही नव्या संधींसाठी अग्रदूत ठरेल. आधुनिक पॉवरग्रीड, गॅस पाईपलाईन, मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी, विक्रमी संख्येने असलेले द्रुतगती मार्ग, आर्थिक विभागांमधील संपर्क मजबूत करणे, आधुनिक रेल्वेच्या पायाभूत सुविधा, पूर्व आणि पश्चिम भागातील मालवाहतूक कॉरिडॉर यामुळे उत्तर प्रदेशाचा विकास झपाट्याने होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील गुंतवणूकदारांची परिषद 2018, 21 आणि 22 फेब्रुवारी 2018 रोजी झाली होती. पहिल्या भूमीपूजन समारंभाच्या दरम्यान, 61,500 कोटी रूपये किमतीहून अधिक मूल्यांच्या तर दुसऱ्या भूमीपूजन समारंभात 67, हजार कोटी रूपये गुंतवणूक असलेल्या 290 प्रकल्पांची पायाभरणी झाली होती.