कोलकाता – भाजपच्या प्रवक्त्यांकडून झालेल्या आक्षेपार्ह विधानांवरून आज दुसऱ्यादिवशीही पश्चिम बंगाल मध्ये अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. काही ठिकाणी पोलिस व निदर्शकांमध्ये जोरदार झटापटही झाली. त्या संबंधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात संतप्त प्रतिक्रीया दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की भाजपने पाप करायचे आणि त्याचे परिणाम अन्य लोकांनी भोगायचे हा प्रकार सध्या चालू आहे. त्यांना दंगलीच भडकवायच्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हावडा येथील स्थिती बिघडलेली आहे. काही लोकांना हे मुद्दामच घडवायचे आहे असे दिसते; पण आम्ही ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. भाजपने केलेल्या पापांची फळे लोकांनी का म्हणून भोगायची असा सवालही त्यांनी केला.
हावडा येथे काल नूपुर शर्माला अटक करा या मागणीसाठी जोरदार निदर्शने झाली. त्यावेळी जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. तेथेच आजही पुन्हा हिंसक घटना घडल्या आहेत. गुरूवारीही येथे निदर्शने आणि रास्ता रोको करण्यात आला होता त्यावेळी ममतांनी निदर्शकांनी येथे गडबड करण्यापेक्षा दिल्लीत जाऊन आपला रोष प्रकट करा, अशी सूचना केली होती.