औरंगाबाद – अमरावती शहरात झालेल्या हिंसक प्रकारावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठीच हा डाव रचला गेला आहे.
तथापि सरकार मजबूत असून या हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्यांचे चेहरे लवकरच उघडे करून त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा इशाराही संजय राऊत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, राज्यातील हिंसाचाराच्या घटनांचे भांडवल करून काही विरोधी पक्ष राज्यपालांना भेटून त्यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचा आरोप करतील आणि त्यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्य सरकारच्या विरोधात पत्र लिहिले जाईल.
राज्यात भविष्यातही अशा काही घटनांचा धोका उद्भवू शकतो. अमरावतीच्या प्रकारामागे नेमके कोण आहे, याचा छडा लावण्याचे काम पोलीस करीत आहेत असेही ते म्हणाले.