नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोहम्मद अलि जिनांची तुलना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी केली होती. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे आमदार खालीद अन्वर यांनी जिनांना महान स्वातंत्र्य सेनानी म्हटल्यानंतर जिना यांच्यावरून विधानांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे व त्यामुळे उत्तर प्रदेशच्या निवणुकीत हाच मुद्दा पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अखिलेश यादव यांच्यानंतर त्यांचे नव्याने मित्र झालेलेले उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांनी देखील दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात जिनांबद्दल वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.
जर जिना भारताचे पंतप्रधान झाले असते, तर देशाची फाळणीच झाली नसती असा दावा राजभर यांनी केला होता. त्याला एमआयएम पक्षाचे असुद्दीन ओवेसी यांनी काल उत्तर दिले होते. त्यांनीही फाळणीला कॉंग्रेस व त्यांचे तेव्हाचे नेते जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्याचे पडसाद उमटत असतानाच आता अन्वर म्हणाले की,
मोहम्मद अली जिना हे अखंड भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना पाकिस्तानबद्दल अतीव आदर होता. ते एक मोठे नेते होते यामध्ये अजिबात शंका नाही. देशाच्या फाळणीला ते जबाबदार होतेच, पण त्यांच्याइतकेच भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि कॉंग्रेसदेखील फाळणीला जबाबदार होते.
कॉंग्रेसच्या फोडा आणि राज्य करा या धोरणामुळेच देशाची फाळणी झाली. कॉंग्रेस करत असलेल्या राजकारणाचा हा चेहरा आहे. आणि त्याच प्रकारचे राजकारण कॉंग्रेस खेळत आली असल्याची टीका त्यांनी केली.