विरोध! विरोध!! विरोध!!! कॅबला ईशान्येत विरोधच
राज्यात कायदा लागू होऊ देणार नाही : ममता बॅनर्जी
अमित शहा यांचा शिलॉंग दौरा आंदोलनामुळे रद्द
कोलकाता : प. बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू करण्यात येणार नाही, असे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला ठणकावले. या कायाद्याच्या निषेधार्थ ईशान्य भारतात हिंसाचार उफाळला असून त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी त्यांचा नियोजित मिझोराम दौरा रद्द केला आहे. आसाममध्ये शुक्रवारीही संचारबंदी झुगारत नागरिक रस्त्यावर उतरले होते.
या पार्श्वभूमीवर कोलकात्यात तृणमूल कॉंग्रेसच्या मेळाव्यात ममता बॅनर्जी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हे भगवे सरकार आमच्यावर हा कायदा लादू शकत नाही. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि नागरिकत्व सुधारणा कायदा (कॅब) संसदेत मंजूर केला तरी आम्ही राज्यात लागू करू देणार नाही. आमच्यावर भाजपा तो लादू शकत नाही.
या कायद्याच्या विरोधात राज्यभर निदर्शने करण्यात येणार असून त्यासाठी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नियोजित दिल्ली दौरा रद्द केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नगरिकत्व कायद्यामुळे भारतात फूट पडेल, अशी भीती व्यक्त करत त्या म्हणाल्या, जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत या देशातून कोणालाही बाहेर काढले जाणार नाही. जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी त्यांची नियोजित शिखर परिषद या आंदोलनामुळे पुढे ढकलली हे देशासाठी लांच्छनास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, बांगलादेशच्या गुवाहाटी येथील उच्चायुक्तांच्या ताफ्यावर निदर्शकांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध त्या देशाने व्यक्त केला. भारताचे ढाक्यातील राजदूतांना पाचारण करून बांगलादेश सरकारने ईशान्य भारतातील परिस्थितीबाबत वाटणारी चिंता व्यक्त केली. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची मागणी केली.
ऑल आसाम स्टुडंटस् असोसिएशनने कॅबविरोधात सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करणार असल्याचे संघटनेचे सल्लागार समुज्जल भट्टाचार्य यांनी सांगितले. संचारबंदी लागू असतानाही घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजप नेतृत्व आसामच्या लोकांचा शिरच्छेद करत असल्याचा आरोप केला. हा कायदा मंजूर झाल्यावर त्यावर रात्रीत सही केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रपती रामणाथ गोविंद यांच्यावरही टीका केली. हे दुर्देवी आहे. पण आमचा खटला सर्वोच्च न्यायलयाने दाखल करून घेतला आहे. आता आमचा कायदेशीर लढा सुरू होईल असे ते म्हणाले. त्याचवेळी हा कायदा मागे घेईपर्यंत आमचे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरूच राहील असे त्यांनी सांगितले.
204पर्यंत मोदी यांनी सगळे घुसखोर बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता बांगलादेशीयांना निमंत्रीत करून आसामी नागरिकांचा शिरच्छेदचकरत ाहेत. त्यामुळे आमचा त्यांच्यावर विश्वास राहीला नाही. आसाम करार ही राष्ट्रीय बांधीलकी आहे. त्याला घटनात्मक वैधता देताना संसदेत त्यावर चर्चा झाली होती. भाजपाच्या अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही त्याचे स्वागत केले होते, असे ते म्हणाले.
अमति शहा यांचा शिलॉंग दौरा रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी शिलॉंगला भेट देणार होते. तेथील इशान्य पोलिस अकादमीची ते पाहणी करणार होते. मात्र ईशान्य भारतात कॅबविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट रद्द केली आहे. झारखंड निवडणुकांनंतर ते तेथे भेट देतील, असे गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी स्पष्ट केले.