रस्ते, पाणी, शैक्षणिक सुविधा आणि शासकीय कामे बिकट अवस्थेत
देऊळगावराजे- दौंड तालुक्याच्या पूर्वभागतील नागरिकांचे जीवन हे अनेक समस्यांमुळे अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांसमोरील समस्यांचे निराकरण कसे होणार, हा महत्त्वाचा प्रश्न समोर येत आहे.
दौंड-सिद्धटेक रस्त्याची दुरवस्था हा तर येथील महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रीत मुरुमाचा वापर करण्यात आला असल्यामुळे रस्त्यावर सगळीकडे धुळीचे साम्राज्य आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या धूळ उडवतच जातात आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांना कान-नाक-तोंड झाकूनच येथून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यासाठी मागील चार वर्षांत राज्य सरकारच्या वतीने आतापर्यंत 47 लाख रुपये खर्च करूनसुद्धा हा रस्ता कायम खड्डेमय आणि धूळ अशा समीकरणांतून बाहेर येताना दिसत नाही.
दौंड तालुक्यासाठी भीमा नदी वरदान ठरलेली आहे, असे बोलले जात आहे; पण सध्या या नदीतील पाणीसुद्धा दूषित झाले आहे. हे पाणी डिझेलमिश्रीत आहे. त्यामुळे पाण्यातील जीव धोक्यात आले आहेत. तेच पाणी जमिनीसाठी वापरून जमिनीही नापीक होत चाललेल्या आहेत.
तालुक्याच्या पूर्वभागात अवैध दारू विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे, दारू बंदीसाठी दौंड पोलीस स्टेशनला अनेक निवेदनही देण्यात आली आहेत, तसेच महिलांनी अनेकवेळा उपोषणही केले आहे; पण दारूबंदी झाली नाही.
- विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली
पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाची स्थिती तर इतकी बिकट आहे की शाळेमध्ये विद्यार्थी कमी झाले आहेत. काही शाळांमध्ये 23 विद्यार्थी आणि शिक्षक आहेत मात्र दोन. त्यातील एक हजर आणि एक गैरहजर अशी परिस्थिती असल्यामुळे पालकांना आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी खासगी शाळेत मुलांना पाठवावे लागत आहे. खाजगी शाळांचा खर्च जास्त असल्यामुळे मजूर नागरिकांच्या मुलांचे स्थिती बिकट झाली आहे. सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना कपडे, वह्या-पुस्तके मोफत असूनसुद्धा विद्यार्थी शाळांमध्ये का वाढ नाही, याला जबादार कोण, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. - ग्रामीण भागातील नागरिकांचे शहराकडे स्थलांतर होत आहे, इंग्रजी माध्यमाकडे कल वाढत चालला आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीत आहे तोच पट टिकवणे महत्त्वाचे आहे. शाळांमध्ये गुणवत्ता वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि पट वाढविण्यासाठी विविध उपक्रम केले जात आहेत.
सुनील कुराडे, गट शिक्षण अधिकारी, दौंड - दौंड-सिद्धटेक रस्त्याची अवस्था दयनिय झाली असून, या रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होत आहेत. सध्याच्या या रस्त्याने दौंडला जाणारे विद्यार्थी, नोकरवर्ग आणि इतर नागरिक यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि हे मान्य करण्यासारखीच परस्थिती आहे.
– स्वाती गिरमकर, सरपंच, देऊळगाव राजे