पाटण -करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विपरित परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला आहे. मुंबई, पुणे यासारख्या शहरावर झालेल्या परिणामांचा मोठा फटका ग्रामीण विभागालाही बसला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांनी आपत्ती हीच संधी समजून मिळालेल्या संधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करावा. ग्रामीण विभागातील जनतेचा आणि गावांचा कायापालट करण्याची ताकद मनरेगा योजनेत आहे. जनतेने मनरेगा योजनेतील कामे हाती घेऊन गावांचा कायापालट घडवून आणावा, असे आवाहन सत्यजित पाटणकर यांनी केले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पाटण अर्बन बॅंकेच्या सभागृहात पंचायत समिती तसेच नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सभापती राजाभाऊ शेलार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी उपस्थित होते.
सत्यजित पाटणकर म्हणाले, करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत उद्योग-व्यवसायासह सर्वच क्षेत्रातील कामे ठप्प झाली आहेत.
मात्र टाळेबंदीमुळे आता पुन्हा लोकांची पावले रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागाकडे वळत आहेत. राज्यभरात आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनरेगा मजूरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचायत समितीने आता ग्रामपंचायत निहाय कामांचे नियोजन करुन स्थानिक जनतेला दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची क्षमता असलेल्या या योजनेतील समाविष्ट विविध कामे हाती घेऊन कामे सुरू करण्यासाठी गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेवून गावातील लोकांना प्रोत्साहन द्यावे. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
यावेळी सभापती राजाभाऊ शेलार म्हणाले, सभापती आपल्या दारी या उपक्रमाद्वारे जनतेचा विकासात्मक कार्यातील सहभाग वाढला आहे. घर तेथे शौचालय, शोषखड्डे, गटर मुक्त गाव, बंदिस्त गटर, डासमुक्ती अशा जनतेच्या आरोग्याशी संबंधित कामांमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातून स्थानिक जनतेसाठी रोजगार निर्मितीही होत आहे.
अकुशल रोजगाराच्या पूर्ततेबरोबरच दीर्घकालीन कामांचे नियोजन करण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर याचे नियोजन करण्यात येत असून याकामी ग्रामसेवकांनी गावनिहाय कामे सुरू करण्यासाठी लोकसहभाग वाढवावा. या योजनेतून झालेल्या कामांचे अनुदान तातडीने देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते.