नवी दिल्ली – 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदींनी निवडकपणे विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. यादरम्यान मोदींनी गाव, शेतकरी, मुस्लिम, भ्रष्टाचार आणि समान नागरी कायदा यावरच भर दिला. एकप्रकारे पंतप्रधान मोदींनी 2024 च्या निवडणुकांबाबत भाजपचा अजेंडाच सेट केला आहे. या मुद्यांवरून आता निवडणुकीच्या अनुषंगाने अर्थ काढले जात आहेत. याबाबत अनेक नामांकित वृत्तवाहिनींच्या राजकीय विश्लेषकांनी रिपोर्टही शेअर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी परिवारवादावरून विरोधी पक्षांवर निशाणा साधत म्हणाले,’तुम्हाला तुमच्या मुला-मुलींची काळजी वाटत असेल तर भाजपला मतदान करा.’ परिवारवाद आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांना घेरले.युद्धाच्या काळातही महागाई नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केल्याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि
आयुष्मान भारत योजना आणि जेनेरिक औषधांच्या दुकानांमुळे लोकांकडून होणाऱ्या बचतीचे आकडेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. पीएम मोदींनी कल्याणकारी योजनांबाबत लोकांना अधिका अधिक माहिती मिळावी आणि जनजगजागृती व्हावी असेही ते म्हणाले आहे. पंतप्रधानांच्या संपूर्ण अभिभाषणाचे सार पाहिल्यास गावे, शेतकरी, मुस्लिम, भ्रष्टाचार आणि समान नागरी संहिता केंद्रस्थानी राहिले
गाव
2047 पर्यंत गावाचा विकास होईल तेव्हाच भारताचा विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. लाभार्थ्यांबाबत मोदी पुढे म्हणाले की, ‘आमचा उद्देश एका योजनेचा लाभ कोणत्याही लाभार्थ्याला देणे नसून 100% कव्हरेज असणे हा आहे. त्याला कोणत्याही योजनेचा लाभ मिळण्याचा अधिकार आहे, ज्यासाठी ते पात्र आहे.’
पंतप्रधानांनी बूथ कार्यकर्त्यांना लाभार्थी कोणत्या योजनांसाठी पात्र आहे हे पाहण्यास सांगितले. यातून जनतेची सेवा होईल तसेच भाजपचे कामही होईल. असं ते सूचक बोलले. पंतप्रधान मोदींच्या गावावर लक्ष केंद्रित करण्यामागे राजकीय तज्ञ प्रामुख्याने तीन कारणांचा विचार करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या गावांमध्ये जास्त आहे. दुसरे म्हणजे, एकेकाळी शहरी पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपने 2014 च्या निवडणुकीपासून ग्रामीण भागात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तिसरे कारण म्हणजे ग्रामीण भागातील लोकसभेच्या जागा, ग्रामीण मतदार हा प्रमुख घटक आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, 543 सदस्यांच्या लोकसभेतील अर्ध्याहून अधिक (सुमारे 300) जागा ग्रामीण भागातील आहेत. निमशहरी भागातील जागांचाही समावेश केला तर अशा जागांची संख्या 350 पेक्षा जास्त होईल. देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या गावांमध्ये राहते. कोणत्याही पक्षाला सत्तेवर आणण्यात किंवा सत्तेतून दूर करण्यात ग्रामीण मतदारांची निर्णायक भूमिका असते. 2014 च्या निवडणुकीपासून भाजपमध्ये सामील झालेल्या ग्रामीण मतदारांना टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींचे गावांवर लक्ष केंद्रित करणे हा त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. पंतप्रधानांचा संदेश स्पष्ट आहे की, ‘2024 च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष ग्रामीण भागातील मतदारांवर असेल.’
शेतकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अनेकदा उल्लेख केला. किसान सन्मान निधी ते पीक विमा योजनेबाबत बोलताना पीएम मोदींनी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली आणि विरोधी पक्ष काँग्रेसवरही हल्लाबोल केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘काँग्रेसची एकच धोरण आहे. आधी शेतकर्यांना अडचणीत आणू द्या आणि मग कर्जमाफीच्या नावाखाली खोटे बोलून मतांचे पीक घ्या.’
तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते आणि प्रदीर्घ आंदोलनानंतर केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले. लोकसभा निवडणुकीत शेतकरी बिथरला तर भाजपसाठी सत्तेचा मार्ग अवघड होऊ शकतो आणि हे लक्षात घेऊन पीएम मोदींनी आता शेतकऱ्यांना जुन्या दिवसांची आठवण करून दिली आहे तसेच त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांची आठवण करून दिली आहे.
मुस्लिम व्होटबँक
तिहेरी तलाकच्या बाजूने बोलणाऱ्यांचाही पंतप्रधान मोदींनी समाचार घेतला आणि व्होटबँकेचे भुकेले लोक मुस्लिम मुलींवर अन्याय करत असल्याचे म्हटले. जर तिहेरी तलाक हा इस्लामचा अत्यावश्यक भाग असेल तर कतार, जॉर्डन, इंडोनेशिया सारख्या देशांनी तो का बंद केला? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. भाजप आता आपल्या कट्टर हिंदुत्वाच्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. असे एका वृत्त वाहिनीच्या जेष्ठ पत्रकराचे म्हणणे आहे.
समान नागरी कायदा ( यूनिफॉर्म सिविल कोड )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समान नागरी कायदाबाबत उघडपणे बोलून विरोधक भडकावत असल्याचा आरोप केला. मोदी पुढे म्हणाले की, भारतातील मुस्लिम बांधवांना भडकवून कोणते राजकीय पक्ष राजकीय फायदा घेत आहेत, हे समजून घेतले पाहिजे. यूनिफॉर्म सिविल कोडला सूचित करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘जर घरातील एका सदस्यासाठी एक कायदा असेल आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल तर घर चालेल का? अशा दुहेरी व्यवस्थेत देश कसा चालणार?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भ्रष्टाचार
विरोधकांच्या ऐक्याबाबत पटना येथे झालेल्या बैठकीतही पंतप्रधान मोदींनी खिल्ली उडवली. भ्रष्टाचार आणि निवडणुकीपूर्वी हमीभाव देण्यावरूनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पाटणा येथे जमलेल्या पक्षांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान म्हणाले की, हे सर्व विरोधी पक्ष भ्रष्टाचार आणि लाखो कोटींच्या घोटाळ्यांची हमी आहेत. काही दिवसांपूर्वी एक ‘फोटो ऑप’ कार्यक्रम झाला. त्या फोटोतील सर्व लोकांची एकूण संख्या घेतली, तर २० लाख कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची हमी आहे. लाखो कोटींचा घोटाळा एकट्या काँग्रेसचा आहे.
पंतप्रधान टूजी ते कोळशापर्यंत यूपीए सरकारच्या घोटाळ्यांची यादीही मोदींनी यावेळी मोजली. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाईची हमी देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘काही लोकांना फक्त आपल्या पक्षाचे भले करायचे आहे कारण त्यांना कमिशनचा वाटा मिळतो. तर आमचे प्राधान्य देश आहे आणि आम्ही समाधानाच्या मार्गावर चालतो. एनडीएचा सामना करण्यासाठी विरोधक एकत्र आले तर भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला धार देण्याची, निवडणुकीला तुष्टीकरण विरुद्ध समाधान असे स्वरूप देण्याची रणनीती पीएम मोदींनी स्पष्ट केली आहे.
मात्र, गेल्या 10 वर्षांपासून केंद्रात भाजपचेच सरकार आहे. अशात 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा कितपत प्रभावी ठरेल? हा देखील पाहण्यासारखा मुद्दा असेल.