मुंबई : राज्यात बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गटातील नेते मंडळी रोज एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे बंडखोरी होऊन जवळपास अकरा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही ठाकरे गटाची गळती थांबण्याचे नाव घेत नाही. असे असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाही. कारण आता बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
बीडमधील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावरआला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे.
ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारेंना मारहाण? pic.twitter.com/hEusvwCWgN
— Ravindra Mane (@i_am_Ravindra1) May 18, 2023
शेअर केलेल्या व्हिडीओत अप्पा जाधव यांनी, “सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.” असल्याचे म्हटले आहे.
खरं तर, सुषमा अंधारे सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’निमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये होणार आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. पण त्यांचा हा आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचे सुषमा अंधारे म्हटले आहे.