इर्शाळवाडी – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ पथके बचाव कार्य करत आहे. 98 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे तर 12 जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
इर्शाळवाडी गावातजाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. मात्र सध्या या दुर्घटनास्थळी पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बचावकार्यत अडथळे येत आहेत. पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली.
अशात दुर्घटनेची माहिती मिळताच स्वतः या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पोहोचले असून, त्यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत धीर देखील दिला. या नागिरकांचं आदित्य ठाकरे सांत्वन करत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरेंसोबत अनिल परब आणि सुनील प्रभू देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “इर्शाळगड इथून थोड्या अंतरावर आहे. मात्र तिथं गर्दी होता कामा नये. आपण तिकडे गेल्यानं मदत कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथंच थांबून होईल ती मदत करावी, इर्शाळवाडीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या गावातील नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा..’ असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.
ते पुढे म्हणाले की.., ‘इर्शाळवाडीतील परिस्थिती गंभीर आहे. अंबादास दानवे आणि मी, सुनील प्रभू वरती त्या गावात जाऊन आलो. मदतकार्य सुरु आहे. मदत कार्याला अडथळा नको म्हणून आम्ही खाली आलो आहोत. नागरिकांना धीर देण्याचा, सांत्वन करण्याता प्रयत्न केला. देवाकडे प्रार्थना करावी की सगळे सुखरुप असावेत’. असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.