आगरताळा – भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार दिबा चंद्र हरंगखवाल यांनी बुधवारी विधानसभेचा राजीनामा दिला. यासह ते यावर्षी राज्यातील सत्ताधारी आघाडी सोडणारे सातवे आमदार ठरले आहेत.
धलाई येथील करमचेरा येथील आदिवासी आमदार हरंगखवाल यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी राजीनामा देण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आहेत. ते म्हणाले की, आज विधानसभेचे अध्यक्ष रतन चक्रवर्ती उपस्थित नव्हते, त्यामुळे आज मी माझ्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेच्या सचिवांकडे सुपूर्द केला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा दिला आहे. मी अद्याप माझी कार्यपद्धती निश्चित केलेली नाही, परंतु मी राजकारणात नक्कीच येईन कारण मी एक राजकारणी आहे.
हरंगखवाल हे पूर्वी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्षही होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हरंगखवाल यांच्यासोबतच या वर्षाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते आशिष कुमार साहा यांनीही भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपने यंदा चार आमदार गमावले. साहा यांच्याशिवाय आमदार सुदीप रॉय बर्मन आणि बर्बो मोहन त्रिपुरा यांनीही या वर्षाच्या सुरुवातीला राजीनामा दिला होता.
Bihar Politics : लालू आमच्याबरोबर आल्याने त्यांची CBI चौकशी – नितीशकुमार
सुरमा मतदारसंघातील आमदार आशिष दास यांना त्यांच्या कथित गैरवर्तनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. राज्यातील भाजपचा सहयोगी पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे धनंजय त्रिपुरा, वृषकेतु देबबर्मा आणि मेवाड कुमार जमातिया या तीन आमदारांनीही राजीनामा दिला आहे. धनंजय त्रिपुरा आणि मेवाड कुमार जमातिया यांचे राजीनामे सभापतींनी स्वीकारले आहेत. मात्र, ब्रिष्केतू अपात्र ठरला.
भाजपचे प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती यांनी सांगितले की, हरंगखवाल बरेच दिवस आजारी होते आणि ते त्यांचे काम करू शकत नव्हते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. 60 सदस्य असलेल्या राज्य विधानसभेत भाजपचे 34 आमदार आहेत, तर मित्रपक्ष आयपीएफटीचे पाच आमदार आहेत. विरोधी कॉंग्रेसकडे एक आमदार आणि माकपचे 15 आमदार आहेत, तर पाच जागा रिक्त आहेत.