वीसगाव खोरे, (वार्ताहर) – बारामती लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भोर तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून तालुक्यातील वीसगाव आणि हिरडस मावळ खोऱ्यात महाविकास आघाडी व महायुतीच्या प्रचार प्रमुखांसह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते गावभेट दौरे करत भाग पिंजून काढत आहेत.
बारामती लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (शरद पवार गट) सुप्रिया सुळे तर महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुनेत्रा पवार यांची उमेदवार म्हणून नावे घोषित करण्यात आली आहेत.
महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, शैलेश सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आनंदा आंबवले, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, युवा नेते अनिल सावले, दत्त दिगंबर चेअरमन उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, सुधीर खोपडे, राजेंद्र शेटे, शिवसेना उबाठा गटाचे कुलदिप कोंडे, माऊली शिंदे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ,
यशवंत डाळ, विठ्ठल शिंदे, संदीप नांगरे तसेच तिन्ही पक्षाचे पदाधिकारी तर महायुतीकडून राष्ट्रवादीचे संतोष घोरपडे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, पीडीसीसीचे संचालक भालचंद्र जगताप, माजी उपसभापती विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती सुनील भेलके, मनोज खोपडे, रघुनाथ भोसले,भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे, समीर घोडेकर, तर शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल पांगारे तसेच मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
गावभेट दौऱ्यांवर जोर…
भोर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या हिरडस मावळातील नीरा देवघर धरणाच्या दोन्ही बाजुंची गावे, महुडे खोरे, वेळवंड खोरे, मळे भुतोंडे खोरे, आंबवडे खोरे, वीसगाव खोरे या ठिकाणचे गावभेट दौरे दोन्ही बाजूंकडून केले आहेत. तर काही ठिकाणी सुरू आहेत. सुप्रिया सुळे,सुनेत्रा पवार यांनी पदाधिकाऱ्यांसोबत गावभेट दौरा घेत ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेतल्या.
त्यामुळे ख-याअर्थाने या वीसगाव ,हिरडस मावळ खोऱ्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातून मतांची आघाडी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. अजून दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर तालुक्यात मोठ्या नेत्यांच्या सभा होणार असून प्रचाराचा जोर वाढून वातावरण तापणार असल्याचे दिसून येतेय.