अळकुटी – पारनेर तालुक्यातील रांधे गावातील जुन्या वेशीचा पाया खोदताना साधारण 5 फूट खोलीवर एक लंब शिलालेख आढळून आला. गावातील प्रा. विलास आवारी यांनी इतिहासाचे अभ्यासक महेश जोशी यांना सदर माहिती सांगितल्याने त्यांनी त्याची पाहणी करून शिलालेख म्हणजे एक वीरगळ आहे, असे नमूद केले.
गावातील जुनी वेस पाडून नवीन वेस बांधण्यासाठी खोदकाम सुरू असताना एक वीरगळ सापडल्याने तो एक कुतूहलाचा विषय बनला आहे. वीरगळ साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन कोरून घेतले जातात.
वीरगळीचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. खालच्या भागात वीर युद्धात लढत आहेत, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते. उदा. गायीसाठी लढाई, घोड्यासाठी लढाई आदी मधल्या भागात वीर देवदूत किंवा अप्सरांच्याबरोबर स्वर्गात जात असल्याचे म्हणजेच वीराचा मृत्यू झाल्याचे दाखवलेले असते.
युद्धात मरण आल्यास स्वर्गलोकप्राप्ती होते, असे यातून सुचवायचे असावे. काही वीरगळींवर चंद्र, सूर्य यात अंकित असतात. आकाशात चंद्र, सूर्य तळपत आहेत, तोपर्यंत या वीरांची स्मृती कायम राहिली, असे यातून सूचित करायचे असावे, अशी नोंद इतिहासात वीरगळ संदर्भात असल्याचे जोशी यांनी सांगितले.
ग्रामस्थ ऐतिहासिक ठेवा करणार जतन ः अडीच ते तीन फूट उंची
जुन्या वेशीच्या खोदकामात जो शिलालेख सापडलेला आहे, त्याचे जतन आम्ही करणार आहोत. हा एक ऐतिहासिक ठेवा असून, त्यासंदर्भातील माहितीही आम्ही फलकाद्वारे इतर पर्यटकांना उपलब्ध करून देणार आहोत.
संतोष काटे उपसरपंच, रांधे