इंदापूर तालुक्यात पानमळेधारकांचे आर्थिक गणित कोलमडले
नीलकंठ मोहिते
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, पानमळे जीवापाड जपले; मात्र चांगल्या पानाच्या मोठ्या डागाला अक्षरशः हजार ते बाराशे रुपये मिळत असून सरपट पानाला तर दोनशे रुपये डाग विक्री होत असल्याने, पानमळेधारक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पानमळे जोपासण्यासाठी जो खर्च झाला तो मातीमोल होत चालला आहे.
तालुक्यातील निमगाव केतकी येथे एकमेव विड्याच्या पानाचा बाजार भरतो. या पान बाजारात उजनी जलाशयाच्या बॅक वॉटर पट्ट्यातील पानमळे धारक शेतकरी विड्याची पाने घेऊन विक्रीसाठी येत असतात. पानमळे जगवताना खतांच्या वाढत्या किमती औषधांचा भरमसाठ वापर या सर्व गोष्टींना शेतकरी कसेबसे अर्थकारण जुळवत पानमळे जपतो आहे; परंतु सातत्याने शेतकऱ्यावर संकटांमागून संकटे समोर उभे राहत आहे. असेच संकट उन्हाळ्याची चाहूल लागण्याच्या अगोदरच ऐन थंडीत, पानमळा धारक शेतकऱ्यांवर आल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.
मध्यंतरी अतिवृष्टी झाली. यामध्ये पाने जागीच सडल्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. शासनाकडून यासंदर्भात शेतकऱ्यांच्या हातात नुकसानीचा रुपयाही मिळाला नाही. त्यातूनही शेतकरी स्वतःला सावरत कर्ज काढून हे पानमळे जगवण्यासाठी यशस्वी झाला. सद्यस्थितीला थंडीचे प्रमाण असल्यामुळे पान खाण्याचे प्रमाण कमी होत असते. याचा फटका व आंध्रप्रदेशातून विड्याच्या पानांची आवक वाढल्याने दर प्रचंड घसरलेले आहेत.
आज (रविवारी) निमगाव केतकीच्या पान बाजारात पानाला दरच नसल्यामुळे एक चांगला डाग एक हजार ते बाराशे रुपयाला विक्री होत होता. त्यामुळे पानमळाधारक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. पानमळे जगवताना रात्रंदिवस शेतकऱ्याला मेहनत घेऊन देखील हाती भोपळा अशी गत निर्माण झाली आहे. एका डागांमध्ये 6000 हजार पाने असतात कळी, शेज, फापडा, नवती पान, सध्या पान बाजारात विकली जात आहे. दिघंची, मोडलिंब, बार्शी, वैराग, सोलापूर या भागातील पान व्यापारी निमगाव केतकी येथील पान बाजारात खरेदीसाठी दाखल झालेले आहेत. पान बाजारात पानांना दर नसला तरी देखील, नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपले पानाचे डाग विक्री करावी लागत आहे.
केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे
शेतात पिकवलेल्या जाणाऱ्या कोणत्याही पिकाचे नुकसान झाले तर, राज्य शासन केंद्र शासन शेतकरी जगला पाहिजे, म्हणून मदत करत असतो; मात्र कित्येक वर्षांपासून पानमळेधारक शेतकऱ्यांना, शासनाकडून कोणतीही मदत संकटात मिळत नाही. ही मदत पानाचे नुकसान व दर कोसळल्यावर, पान विक्रीवर संकट आल्यावर देणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी राज्य शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा करावा व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र शासनाकडे पानमळे धारक शेतकऱ्यांना संकटात वाचवण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा पानमळेधारक शेतकरी पोपट येरळकर यांनी व्यक्त केली.