– माधव विद्वांस
भारतीय संगीतक्षेत्रातील एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक म्हणजे गजानन ऊर्फ विष्णू नारायण भातखंडे. त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 रोजी वाळकेश्वर, मुंबई येथे झाला. अलिबागजवळील प्रसिद्ध सागरकिनारा असलेले नागाव हे त्यांचे मूळगाव. त्यांना संगीताची आवड होती. ते स्वरमंडल हे तंतुवाद्य उत्तम वाजवत असत. ते लहानपणीच बासरी शिकले. महाविद्यालयात शिकत असतानाच सतार वाजवण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले.
त्यांनी 1885 मध्ये बी.ए. व 1887 मध्ये एलएल.बी. पदवी प्राप्त केली. दरम्यान ते वर्ष 1870 मध्ये स्थापन झालेल्या पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या “गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये वर्ष 1884 मध्ये दाखल झाले. तेथे त्यांना तत्कालीन नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. या संस्थेमध्ये त्यांच्या संशोधनाला चालना मिळाली. या संस्थेत त्यांनी अनेक वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि अनेक वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपरिक धृपदे, ख्याल, होऱ्या, तराणे, ठुमऱ्या यांची माहिती व चीजा गोळा केल्या. त्यांना असे आढळून आले, की सध्याच्या गायकांच्या चीजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरूपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही.
शास्त्रीय स्वरलिपी उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने व नवीन पद्धतीचा प्रचार नसल्याने त्यांनी रागरागिण्या व चीजा यावर संशोधन सुरू केले. त्यावर त्यांनी अभ्यास करून पारंपरिक चीजांमध्ये बदल केले आणि नवीन चीजा बनविल्या. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. त्याचप्रमाणे प्राचीन ग्रंथांतर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यातील पूर्ण फरकही त्यांच्या निदर्शनास आला होता. संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी त्यांना आवश्यक वाटली. गायनोत्तेजक मंडळीच्या नेहमी होणाऱ्या नियतकालिक बैठकांमध्ये ते आपले संशोधन मांडू लागले.
हे कार्य जटिल असल्याने आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली व ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत यांच्यासमवेत विचारविनिमय केला. संगीतावरचे दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा त्यांनी शोध घेतला. महत्त्वाच्या हस्तलिखितांची त्यांनी नक्कलप्रती बनवून घेतल्या. या सर्व अभ्यास व संशोधनातून एक खास स्वरलिपी पद्धती प्रचलित केली.
प्राचीन संगीतविद्येचे संशोधन व नव्या संगीतशास्त्राची उभारणी केली. संगीतशास्त्रासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. वर्ष 1916 मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखड्यांच्या हवाली केली. ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनीही त्यांच्या देखरेखीखाली माधव संगीत महाविद्यालयाची नव्याने स्थापना केली.
वर्ष 1926 मध्ये त्यांनी लखनौ येथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने “मॅरिज कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ स्थापन केले. या संस्थेचेच रूपांतर पुढे “भातखंडे संगीत महाविद्यालया’मध्ये झाले. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यासाठी संगीतपरिषदा भरवण्याची सुरुवातही त्यांनी केली. “लक्षणगीत संग्रह’सारखे दहापेक्षा अधिक संगीतविषयक ग्रंथ लिहिले. आजही हे ग्रंथ संगीतविषयासाठी दीपस्तंभासारखे आहेत. 19 सप्टेंबर 1936 रोजी त्यांचे निधन झाले.