पुसेसावळी – समाजमाध्यमावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी पुसेसावळी, ता. खटाव येथील दंगलीत मृत्यू झालेल्या नूरहसन शिकलगार यांच्या कुटुबीयांचे सांत्वन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. प्रशासनाचा तपास योग्य रितीने सुरू आहे. या दंगलीत बळी गेलेल्या निष्पाप नूरहसन यांच्या कुटुंबीयांना योग्य न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी सूर्यकांत कदम, संतोष घार्गे, दत्तात्रय रुद्रुके, समाधान घार्गे आणि मुस्लिम समाजाचे ग्रामस्थ उपस्थित होते. शिकलगार कुटुंबीयांनी आ. पाटील यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. आमच्या दोन्ही कुटुंबांचा दुवा हरपला आहे. आम्ही जगून काय करू? आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनवणी नूरहसनच्या वडिलांनी केली. या घटनेत हिंदू समाजाचा सहभाग नाही.
हिंदू समाजातील लोक आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. ही दंगल मुस्लिमद्वेष्ट्या संघटनांनी केल्याची माहिती मुस्लिम समाजातील ग्रामस्थांनी दिली. गावातील हिंदू-मुस्लिम समाजात आजही सलोखाच आहे. आमचे हिंदूंशी कोणतेच वैर नाही. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पंचनामे झाले आहेत. तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे, असा आरोप मुस्लिम समाजाच्या काही ग्रामस्थांनी केला. त्यावर आ. पाटील म्हणाले, संपूर्ण माहिती घेऊन तपास सुरू आहे. शिकलगार कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे.