सौंदर्यमीमांसक साहित्यिक, पत्रकार व विचारवंत प्रभाकर आत्माराम पाध्ये यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म रत्नगिरी जिल्ह्यातील लांजे येथे 4 जानेवारी 1909 रोजी झाला. त्यांचे शिक्षण रत्नागिरी, मुंबई आणि पुणे येथे झाले. वर्ष 1932 मध्ये ते बीए झाले. बीए झाल्यानंतरचे पाध्ये मार्क्सच्या विचाराने भारावून होते. त्यानंतर प्रतिभा, चित्रा, धनुर्धारी या मासिकांचे संपादक म्हणून 1939-45 या कालावधीमध्ये त्यांनी काम केले. “प्रतिभे’मध्ये लेखन करीत असतानाच नाटककार मो. ग. रांगणेकर यांनी त्यांना “चित्रा’ या साप्ताहिकाकडे पाठविले.
“चित्रा’मध्ये ते पत्रकार झाले. चित्रातून ते “धनुर्धारी’त आले. “धनुर्धारी’त असतानाच प्रभाकर पाध्ये यांचा 4 जानेवारी 1940 रोजी कमल गोठोस्कर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नवशक्तीचे संपादक म्हणून 1946-53 या काळात काम पाहिले. नवशक्तीत असताना एक तडफदार व व्यासंगी पत्रकार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख झाली. पुढे “इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम’ या संस्थेचे सचिव (1953-54) व “कॉंग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम’चे आशियाई प्रतिनिधी (1955-67) या नात्यांनी त्यांनी काम केले. 1967 पासून “सेंटर फॉर इंडियन रायटर्स’ या संस्थेचे ते संचालक झाले. यावेळी कामाच्या निमित्ताने त्यांना जगभरचा प्रवास घडला.
पाध्ये यांना “मीमांसक’ म्हणत. या शब्दाचा पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे अर्थ, मीमांसा म्हणजे तर्कशुद्ध विचार होय. यावरून त्यांच्या लेखनाचे स्वरूप लक्षात येईल. त्यांनी आजकालचा महाराष्ट्र (1935) हे पहिले पुस्तक श्री. रा. टिकेकर यांच्या सहकार्याने लिहिले. कलेची क्षितिजे (1942), मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा (1970), पाटणकरांची सौंदर्यमीमांसा (1977), आस्वाद (1977), वामन मल्हार आणि विचारसौंदर्य (1978) यांसारख्या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथांचा समावेश होतो. नवे जग नवी क्षितिजे (1953), अगस्तीच्या अंगणात (1957), उडता गालिचा (1959), तोकोनोमा (1961), हिरवी उन्हे (1964) ही प्रवासवर्णनेही त्यांनी लिहिली आहेत. व्यक्तिवेध या नावाने त्यांनी लिहिलेली शब्दचित्रे 1973 मध्ये प्रसिद्ध झाली. निळे दिवस (1976) हा त्यांचा वेचक कथांचा संग्रह.
त्यांच्या “कलेची क्षितिजे’ या समीक्षात्मक ग्रंथात त्यांनी कलेच्या स्वरूपासंबंधी मूलभूत असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मार्क्सवादाचा कलासाहित्यासंबंधीचा दृष्टिकोन, कलासाहित्यातून होणारा मतप्रचार, कला हे निवेदन की आविष्कार, कलासाहित्य आणि विज्ञान यांचे संबंध असे अनेक दृष्टिकोन त्यांनी मांडले आहेत. मर्ढेकरांची सौंदर्यमीमांसा या ग्रंथात त्यांनी मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांची सुंदर मीमांसा केलेली आहे.
मर्ढेकरांच्या सौंदर्यविचाराचे मर्म नेमकेपणाने विशद करून मराठीतील कलाविचाराचा ऐतिहासिक दृष्टीने त्यांनी परामर्श घेतला. पाटणकरांच्या सौंदर्यमीमांसेवर त्यांनी अशाच प्रकारे विचार मांडले आहेत. त्यांच्या प्रवासवर्णनांतून पाध्ये यांचे रसिक, बहुश्रुत आणि कल्पक व्यक्तिमत्त्व दिसून येते. त्यांनी लिहिलेल्या कथांवर मुख्यतः मनोविश्लेषण केलेले दिसते.वर्ष 1950 मध्ये झालेल्या गोमंतक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद व वर्ष 1952 मध्ये मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. 22 मार्च 1984 रोजी त्यांचे निधन झाले. अभिवादन.
माधव विद्वांस