फुलामुलांचे कवी म्हणून ओळखले जाणारे कवी नारायण वामन टिळक यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील करंजगाव येथे 6 डिसेंबर 1861 रोजी झाला. त्यांचे शिक्षण कल्याण व नाशिक येथे इंग्रजी पाच इयत्तांपर्यंत झाले. त्यांच्या मातोश्री जानकीबाई यांनाही काव्यरचनेचा छंद होता. आईकडूनच आपणास काव्यशक्ती लाभली, असे टिळक अभिमानाने सांगत. टिळक अतिशय कुशाग्रबुद्धीचे, एकपाठी होते. त्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांवर प्रभुत्व मिळवले होते.त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता.
“स्मृतिचित्रे’ हे मराठीतील उत्कृष्ट आत्मचरित्र लिहिणाऱ्या प्रसिद्ध लेखिका लक्ष्मीबाई टिळक (माहेरच्या मनूताई गोखले) या त्यांच्या पत्नी. कीर्तनकार, पुराणिक, शिक्षक असे विविध व्यवसाय टिळकांनी केले. अत्यंत भावपूर्ण काळजाला भिडणाऱ्या कविता त्यांनी केल्या. त्यांनी सुमारे दोन हजार कविता केल्या होत्या, तसेच गद्य लेखनही केलं. टिळक कवी म्हणून प्रसिद्ध होतेच, पण ते जास्त प्रसिद्ध झाले त्यांच्या धर्मांतरामुळे.
एकदा रेल्वेने प्रवास करीत असताना त्यांची एका ख्रिस्ती माणसाबरोबर ओळख झाली. त्यांनी बायबलची एक प्रत टिळकांच्या हातात ठेवली आणि लवकरच तुम्ही ख्रिस्ती व्हाल असे सांगून ते निघून गेले. आश्चर्य म्हणजे या दोघांनीही एकमेकांना आपली नावं विचारून कोठे राहता वगैरे परिचय पण करून घेतला नव्हता. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. त्यानंतर त्यांचे विचारमंथन सुरू झाले. त्यांच्या धर्मांतराची चाहुल लागताच नातेवाईक, मित्र परिवाराने त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. 10 फेब्रुवारी 1895 या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा देवदत्त हे त्यांच्यापासून दूर गेले.
मात्र टिळकांच्या पाठोपाठ लक्ष्मीबाईंनीही पाच वर्षांनी ख्रिस्तीधर्माचा स्वीकार केला. ख्रिस्ती झाल्याने टिळकांचा मातृभूमी व मातृभाषा यांचा अभिमान सुटला नाही. वर्ष 1907 मध्ये त्यांनी जळगाव येथे पहिले मराठी कवी संमेलन भरविले. या कविसंमेलनातच बालकवी यांचे नाव साहित्यक्षेत्रात पहिल्यांदा पुढे आले. यावेळी या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. कान्होबा कीर्तिकर यांनी भूषविले होते. त्यांनीच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना यावेळी “बालकवी’ ही पदवी दिली. वर्ष 1915 मध्ये मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचेही ते अध्यक्ष होते. टिळकांनी 1900 ते 1919 या कालावधीमध्ये “ज्ञानोदय’ या ख्रिस्ती मिशनऱ्यांचे नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यांनी ख्रिस्ती अभंग लिहिले.
मराठी ख्रिस्त मंडळींमध्ये “उपासना संगीत’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांना रेव्हरंड ही उपाधी देण्यात आली होती, पण त्यांनी नावामागे रेव्ह. असे लिहू नये असे सुचविले होते तसेच मरणोत्तर दफन न करता दहन करावे असे मृत्युपत्रात लिहून ठेवले होते. 9 मे 1919 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. अभिवादन.
– माधव विद्वांस