घनश्यामदास बिर्ला यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1884 रोजी राजस्थानच्या पिलानी गावात झाला. त्यांचे बालपण व पाचवीपर्यंतचे शिक्षण पिलानी येथेच झाले. आजोबांच्या प्रेरणेने अवघ्या बाराव्या वर्षी ते मुंबईस गेले व त्यांच्या व्यापारात रस घेऊ लागले.
मुंबईत मन रमेना म्हणून ते सोळाव्या वर्षी कलकत्त्याला गेले व शेअरबाजारामध्ये दलाल म्हणून काम करू लागले. या व्यवसायातून त्यांच्या अनेक भागधारकांशी तसेच छोट्यामोठ्या इंग्रज उद्योगपतींशी ओळख झाली. अभ्यासूवृत्तीमुळे त्यांनी कारखानदारांच्या ओळखीतून उत्पादन आणि व्यापार याचे जवळून निरीक्षण केले. शेअर बाजारात काम करीत असल्याने त्यांना बंद पडणारी किंवा विक्री होणाऱ्या उद्योगाची माहिती मिळत असे. उद्योगधंदा उभारण्याचा अनुभव मिळावा म्हणून त्यांनी दिल्ली येथील विक्रीला निघालेली एक कापूस गिरणी खरेदी केली.
वर्ष 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस त्यांनी आपले बंधू जुगलकिशोर, रामेश्वरदास आणि ब्रिजमोहन बिर्ला यांच्या सहकार्याने “बिर्ला ब्रदर्स’ ही मर्यादित उत्पादनसंस्था स्थापन केली आणि ताग व कापूस उद्योगांसाठी भागधारकांकडून भांडवल उभारले. अनेक गुंतवणूकदार व उद्योगपतींशी संबंध असल्यामुळे त्यांना उद्योगांसाठी भागधारकांकडून भांडवल उभारण्यात अडचण आली नाही. ब्रिटिश उद्योगपतींनी त्यांच्या कामाचा झपाटा पाहून सरकारच्या मदतीने बिर्ला ब्रदर्सचे प्रकल्प बंद पाडण्याचे प्रयत्न केले. पण न डगमगता घनश्यामदासजींनी औद्योगिक क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले. पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले तेव्हाच भारताला औद्योगिकीकरणाशिवाय तरणोपाय नाही, याची घनश्यामदासजींना खात्री होती. वर्ष 1923 मध्ये बिर्ला ब्रदर्सनी ग्वाल्हेर येथे “जियाजीराव कॉटन मिल’ ही कापड गिरणी स्थापन केली.
त्यानंतर कापूस, कागद, साखर आणि प्रकाशन या व्यवसायांत बिर्लांनी पदार्पण केले. दुसऱ्या महायुद्धाच्या व नंतरच्या काळात बिर्ला उद्योगसमूहाचा व्याप वाढतच गेला. कापड, यंत्रसामग्री, सायकल, बॉल बेअरिंग, पंखे, रेयॉन, प्लॅस्टिक, प्लायवुड, वनस्पती तेल या विविध वस्तूंच्या निर्मिती क्षेत्रात उत्पादन करण्यास बिर्लांनी प्रारंभ केला. चहा, कोळसा हे उद्योगही त्यांनी हाती घेतले. स्वातंत्र्योत्तर काळात बिर्ला उद्योगसमूह संपूर्ण भारतात वटवृक्षाप्रमाणे पसरला व त्याच्या सावली खाली हजारो उद्योग उभे राहिले. लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला. त्यांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही उठावदार काम केले. त्यांच्या देणग्यांतून, विश्वस्त संस्थांकडून अनेक हॉस्पिटल्स उभी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात “बिर्ला हाउस’ हे राजकीय चळवळीचे एक प्रमुख केंद्र होते.
वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ब्रिटिश सरकारने देऊ केलेली “सर’ ही मानाची पदवी त्यांनी नाकारली. वर्ष 1919 मध्ये महात्मा गांधी आफ्रिकेहून भारतात आल्यावर घनश्यामदासजींचा त्यांच्याशी परिचय झाला व ते महात्माजींचे विश्वासू निकटवर्ती सहकारी झाले. वर्ष 1931 मध्ये लंडन येथे झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी घनश्यामदासजींनी महात्माजींना राजी केले व स्वतः ते भारताचे एक प्रतिनिधी म्हणून या परिषदेस उपस्थित राहिले.
त्यांची राहणी अत्यंत साधी होती. ते तनाने, मनाने आणि धनाने श्रीमंत होते. घनश्यामदास बिर्ला यांचे 11 जून 1983 रोजी लंडन येथे निधन झाले. लंडनच्या हूप लेन येथील गोल्डर्स ग्रीन स्मशानभूमीत त्यांचे स्मारक आहे. त्यात शिलालेखासह एक मोठा पुतळा आहे.
माधव विद्वांस