– माधव विद्वांस
नव्वद वर्षांपूर्वीच्या काळी एखादी महिला 5 वारी साडी नेसून बाहेर पडली की इतर महिला घराचे दार किलकिले करून या महिलेकडे कुतुहलाने पाहात असत आणि नंतर दुपारच्या वेळी मैत्रिणी जमल्यावर अगं तुला कळले का त्या कोपऱ्यावरच्या गोदुताईंची सून चक्क गोल पातळ नेसून बाहेर पडली होती, असे संवाद व्हायचे. अशा काळात चक्क स्वीमिंग ड्रेस घालून “यमुना जळी खेळू खेळ…’ हे गाणे म्हणत एका अभिनेत्रीने धमाल उडवून दिली होती. हे गाणे म्हणणारी गायिका व बिनधास्त अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांचा आज स्मृतिदिन. मीनाक्षी यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1915 रोजी मुंबईतला. त्यांचे मूळ गाव गोव्यातील पेडणी. त्यांचे माहेरचे नाव रतन पेडणेकर. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या राममोहन विद्यालयात झाले.
त्यांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. खॉंसाहेब उस्ताद भूर्जीखॉं आणि गोविंदबुवा शाळीग्राम यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. वर्ष 1935 मध्ये त्या ऑल इंडिया रेडिओमध्ये रुजू झाल्या. तेथे त्यांनी रेडिओ प्रसारित नाटकांमध्ये काम केले. संगीतातली आवड, शिक्षण आणि आकर्षक रूप यामुळे त्यांना संगीत नाटकांत कामे मिळू लागली.
दरम्यान, वर्ष 1936 मध्ये डॉ. शिरोडकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यांनी मीनाक्षी यांना अभिनयासाठी उत्तेजन दिले होते. “हंस चित्र’चे एक मालक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग नाईक यांचे शिरोडकर कुटुंबीयांशी चांगले स्नेहसंबंध होते. त्यांच्यामुळेच मीनाक्षी यांचा “हंस चित्र’ संस्थेत प्रवेश झाला.
“हंस चित्र’ने “ब्रह्मचारी’ या चित्रपटासाठी त्यांच्याशी महिना अडीचशे रुपयांवर करार केला (वर्ष 1938). हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातली पोहण्याचा पोशाख असणारी त्यांची भूमिका हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरली. पहिली भूमिका, पडद्यावरचे पहिले गाणे असा प्रसिद्धीचा दुहेरी मुकुट त्यांना मिळाला. कृष्णधवल चित्रपट जमान्यातील या चित्रपटाचे दिग्दर्शक मास्टर विनायक यांनी केले होते.
चित्रपटाचे पटकथा लेखक व गीतकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांचे मोठे डोळे व रूप यांना अनुसरून त्यांचे नाव रतन वरून मीनाक्षी असे ठेवले व याच नावाने पुढे त्या ओळखल्या जाऊ लागल्या. हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित झाला होता. “ब्रह्मचारी’नंतर त्यांनी मा. विनायक यांच्या दिग्दर्शनाखाली “ब्रॅंडीची बाटली’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात दामूअण्णा मालवणकर यांच्याबरोबर त्यांनी कॉंग्रेस सेवा दलातील तरुणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर “हंस चित्र’ मार्फत देवता (1939), सुखाचा शोध, अर्धांगी (1940) अशा चित्रपटांत त्यांनी काम केले.
त्यांनी एकूण 15 मराठी व 9 हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांनी वर्ष 1950 ते 1975 या कालावधीमध्ये सुमारे 12 नाटकांतून अभिनय केला. “मेरी अमानत’ हा नायिका म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांच्या दोन नाती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि नम्रता शिरोडकर या चालवीत आहेत. 3 जून 1997 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण आजही त्यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आवर्जून घेतले जाते.