माधव विद्वांस
एकोणिसाव्या शतकातील एक प्रसिद्ध इंग्रजी-मराठी कोशकार व शिक्षणतज्ज्ञ, इंडियन पीनल कोडचे ज्यांनी मराठीत भाषांतर केले त्या मेजर थॉमस कॅन्डी यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म ब्रिटनमधील ईस्ट नॉयले (व्हिल्टशर) येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात 13 डिसेंबर 1804 रोजी झाला. त्यांनी मॅग्डेलेन कॉलेज (ऑक्सफर्ड विद्यापीठ) येथे शिक्षण घेतले.
ते वर्ष 1822 मध्ये भारतात आले. थॉमस आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. वर्ष 1832 मध्ये त्यांनी मराठीतून पहिले पुस्तक लिहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केला.
तसेच त्यांनी इतर भारतीय भाषांचे अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन केल्यामुळे त्यांची ईस्ट इंडिया कंपनीतील पायदळात दुभाषी व क्वार्टर मास्टर या पदांवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी भारतातील ब्रिटिश लष्करात लेफ्टनंट, कॅप्टन व मेजर या हुद्द्यांवरही काम केले. जेम्स मोल्सवर्थ इंग्रजी-मराठी कोश तयार करीत होते, त्यांनी थॉमस कॅन्डी यांना साहाय्यक म्हणून घेतले.
दरम्यान मोल्सवर्थ हे इंग्लंडला गेल्यामुळे हे काम लांबणीवर पडले. या वेळी कॅन्डी यांनी सरकारी नियमावलीतील मराठी भाषांतरातील काही चुका दुरुस्त केल्या. वर्ष 1835 मध्ये सरकारने हिंदू कॉलेज व दक्षिणेकडील सरकारी शाळा यांचा सुपरिटेंडेंट म्हणून त्यांची नेमणूक केली. त्यांनी जेम्स मोल्सवर्थ यांचे अपूर्ण राहिलेल्या इंग्रजी-मराठी कोशाचे काम स्वीकारले आणि परिश्रम घेऊन आपल्या भावाच्या मदतीने
सहा-सात वर्षांत (1840 ते 47) पूर्ण केले. यासाठी त्यांना पुण्याच्या पाठशाळेतील अनेक विद्वान पंडितांचे साहाय्य मिळाले; कारण त्यांच्याकडे वर्ष 1837 मध्येच पुणे पाठशाळेच्या मुख्याध्यापकाचे कामही आले होते. कोशाच्या कामानंतर त्यांनी आपले सर्व लक्ष मराठी पाठ्यपुस्तके व इंग्रजी ग्रंथांचे सुगम भाषांतर यावर केंद्रित केले.
मराठी लिखाणात 19व्या शतकापर्यंत विरामचिन्हांशिवाय लेखन होत असे. मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही “दंड’ सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. त्यांनी “विरामचिन्हांची भाषा’ हे पुस्तक लिहून विरामचिन्हांची कशी आवश्यकता आहे हे पटवून दिले. पुढे हे लोकमान्य आणि रूढ झाले. विरामचिन्हांमुळे मराठी लेखन, वाचन आणि भाषणही समृद्ध झाले. ब्रिटिश सरकारने कॅन्डी यांची 1860 मध्ये प्रमुख भाषांतरकार या पदावर नेमणूक केली.
पुणे येथील संस्कृत कॉलेजचे ते मुख्याधिकारी व डेक्कन कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. दक्षिण महाराष्ट्रातील शाळांचे ते अधीक्षकही होते. ब्रिटिश सरकारकडे भारतीय भाषांमधील अनुवाद करण्याची पुस्तके किंवा मराठीत नवीन पुस्तकांचे जे काम येई ते सर्व थॉमस कॅन्डींकडे प्रथम तपासणीसाठी व अभिप्रायासाठी येत असे.
कॅन्डी यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी नीतिबोधकथा, नवीन लिपीधारा, विरामचिन्हांची परिभाषा, वाचनपाठमाला, भाषणसांप्रदायिक वाक्ये, हिंदुस्थानचे वर्णन इत्यादी ग्रंथ निमिर्ती केली. ब्रिटिश भारत सरकारने थॉमस कॅन्डी यांना “कंपॅनियन ऑफ द स्टार ऑफ इंडिया’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. 26 फेब्रुवारी 1877 रोजी थॉमस कॅन्डी यांचे महाबळेश्वर येथे निधन झाले.